‘विद्या विकास मंडळ’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.५): विद्या विकास मंडळ, करमाळा या नामवंत शिक्षण संस्थेला नुकताच ३१ मे रोजी कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था व शिक्षक मेळाव्यात ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर, हातकणंगलेचे खासदार मा. धैर्यशील माने, राज्यसभा खासदार मा. धनंजय महाडिक, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर आणि भास्कर महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा मेळावा एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रथमच कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. राज्यभरातील गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या ४० संस्थांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले असून त्यामध्ये करमाळा येथील विद्या विकास मंडळ यांचा गौरव करण्यात आला.

हा पुरस्कार स्वीकारताना संस्थेचेवतीने कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संभाजी किर्दाक व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.
विद्या विकास मंडळामार्फत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (अनुदानित उच्च माध्यमिक व महाविद्यालय) यशस्वीरित्या चालवले जाते. या संस्थेत विविध उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्याने उज्ज्वल निकाल, एन.सी.सी. व एन.एस.एस.च्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य केले जाते, यामुळे हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा.किर्दाक व प्रा.राख यांनी दिली.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर मा. मनीष कळजे, प्रेरणादायी व्याख्याते गणेश शिंदे, उपमुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ, पंढरपूरचे वासकर महाराज उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मा. गणेश चिवटे व डॉ. बापूसाहेब अडसूळ यांनी केले होते.

या मिळालेल्या पुरस्कारानंतर संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड व इतर सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


