जीवघेणा हल्ला प्रकरणातील मुख्याध्यापकास जामीन मंजूर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : खांबेवाडी येथील जीवघेणा हल्ला प्रकरणातील एका मुख्याध्यापक असलेल्या आरोपीस बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल एस चव्हाण यांनी जामीन मंजूर केला आहे, यात आरोपीच्यावतीने ॲड.निखिल पाटील, ॲड.सुहास मोरे तसेच ॲड.दत्तप्रसाद मंजरतकर, ॲड.सतपाल नरखेडे यांनी काम पाहिले.
यात हकीगत अशी 11 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याचे सुमारास खांबेवाडी (ता.करमाळा) येथील सोमनाथ मारुती नरोटे व नीता सोमनाथ नरोटे यांचेवर सुभाष पांडुरंग शिंदे, रवींद्र सुभाष शिंदे, शांतीलाल पांडुरंग शिंदे, सुनील पांडुरंग शिंदे, आशाबाई सुभाष शिंदे रा.खांबेवाडी यांनी जीवघेणा हल्ला केल्या बाबतची फिर्याद करमाळा पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादवी कलम 307 326 324 323 506 143 144 147 148 149 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता, यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली होती, यातील आरोपी सुनील पांडुरंग शिंदे यांनी ॲड.निखिल पाटील व ॲड.सुहास मोरे यांचे मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन मिळणे प्रकरण दाखल करण्यात आले, जामीन अर्जाचे सुनावणी वेळी आरोपी सुनील शिंदे यांच्यातर्फे ॲड.निखिल पाटील व ॲड.सुहास मोरे यांनी सदर केस मध्ये भा.द.वि.कलम 307 किंवा 326 लागू होत नाही.
यातील जखमी यांना तशा प्रकारच्या कोणत्याही जखमा नाहीत तसेच सदर आरोपी हा केवळ मध्यस्थी होता व त्याचा उद्देश दोन्ही बाजू मधील वाद मिटवणे हाच होता त्याचा फिर्यादी व जखमींना जीवे मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता सर्व हत्यारे जप्त झालेली असून प्राथमिक तपास पूर्ण झालेला आहे, सदरचा आरोपी हा मुख्याध्यापक असून सदर गुन्ह्यामध्ये त्याचा कोणताही सहभाग नाही असा युक्तिवाद केला सदर युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुनील पांडुरंग शिंदे याची 25 हजार रुपयांच्या जातमचलक्यावर व अटी व शर्तीवर जामिनावर मुक्तता करण्यात आली.

