चार पिढ्यांची परंपरा कायम; करमाळ्याच्या सावंत परिवाराचा शंभरावा बैलपोळा उत्साहात..

२१ बैलजोड्या व गोमातांची वाजतगाजत मिरवणूक; पारंपरिक पूजनासह ‘बैलांचे लग्न’ सोहळा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा शहरातील सावंत परिवाराने गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असलेली सार्वजनिक बैलपोळ्याची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली.दुष्काळी परिस्थिती, पाणी व चाऱ्याची टंचाई आणि शेतीतील वाढते यांत्रिकीकरण या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उत्सवात २१ बैलजोड्या तसेच गोमातांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. बैलांची आकर्षक सजावट, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे करमाळा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सावंत परिवाराच्या सार्वजनिक बैलपोळ्याला सुमारे शंभर वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. स्व. अनंतराव आबा सावंत यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर स्व. सुभाष (आण्णा) सावंत व त्यांच्या बंधूंनी ही परंपरा पुढे नेली. पुढे विठ्ठल (आप्पा) सावंत यांनी या उत्सवाचे सातत्य कायम ठेवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हमाल पंचायत अध्यक्ष व आदिनाथ कारखाना संचालक ॲड. राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत आणि नगरसेवक सुनील सावंत यांनी ही परंपरा पुढे नेली. सध्या पै. किरण सावंत यांच्या पुढाकारातून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

बैलांची आकर्षक सजावट
बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांची पारंपरिक पद्धतीने खांदे मळणी करण्यात आली. पोळ्याच्या दिवशी सकाळपासून बैलांना स्नान घालून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. शिंगांना विविध रंग देण्यात आले, अंगावर रंगीबेरंगी झूल चढविण्यात आली, तर गळ्यात घुंगरू व विविध अलंकार घालण्यात आले. फुलांच्या हारांनी सजलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
शहरातून निघाली भव्य मिरवणूक
गुरुवारी (१० सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास सावंत परिवाराच्या वतीने बैलजोड्या व गोमातांची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीने शहरातील वातावरण भारावून गेले. सजविलेल्या बैलजोड्या, शेतकरी, नागरिक आणि गोमाता यांच्या सहभागामुळे मिरवणुकीत ग्रामीण संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले.

विधिवत पूजन अन् ‘बैलांचे लग्न’
मिरवणुकीनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास सावंत गल्ली येथील सावंत परिवाराच्या निवासस्थानासमोर बैलजोड्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. बैलांच्या कपाळावर हळद-कुंकवाचा टिळा लावून फुले व हार अर्पण करण्यात आले. नैवेद्य दाखवून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने ‘बैलांचे लग्न’ लावण्याचा सोहळा पार पडला.
या प्रसंगी उपस्थित नागरिकांनीही बैलांचे पूजन करून त्यांच्या प्रती असलेली आत्मीयता व्यक्त केली.
सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग
सावंत परिवाराच्या या सार्वजनिक बैलपोळ्यात करमाळा शहर व परिसरातील शेतकरी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-तोलार तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे हा उत्सव केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित न राहता सर्वसमावेशक स्वरूपाचा ठरला.

बैलपोळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण जीवनपद्धती, पशुधनाविषयीची आस्था आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन या उत्सवातून घडले.
दुष्काळात पशुधन सांभाळण्याचे आव्हान
यंदा दुष्काळी परिस्थितीचे सावट असल्याने शेतकऱ्यांसमोर पशुधनाच्या संगोपनाचे मोठे आव्हान आहे. पाणी, हिरवा चारा आणि पशुखाद्याच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही शेतकरी आपल्या पशुधनाची काळजी घेत आहे. त्यामुळे यंदाचा बैलपोळा हा केवळ उत्सव न राहता पशुधनाच्या जपणुकीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
शेतीमध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढल्याने बैलजोड्यांचा पारंपरिक शेतीतील वापर कमी झाला आहे. मात्र, शेतकऱ्याच्या कष्टात वर्षभर सहभागी होणाऱ्या या मुक्या जीवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आजही कायम आहे.
नव्या पिढीला परंपरेची ओळख
ग्रामीण जीवनशैली झपाट्याने बदलत असताना पारंपरिक सण आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व वाढले आहे. सावंत परिवाराने चार पिढ्यांपासून जपलेल्या या परंपरेमुळे ज्येष्ठ नागरिकांसोबतच तरुण पिढीलाही बैलपोळ्याचे सांस्कृतिक महत्त्व अनुभवता आले.
बैलपोळा हा केवळ बैलांना सजवून मिरवणूक काढण्याचा उत्सव नसून शेतकरी, शेती, पशुधन आणि ग्रामीण संस्कृती यांच्यातील अतूट नाते जपणारा सण आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी विश्रांती देऊन त्यांचा सन्मान केला जातो.
पुरणपोळीच्या भोजनाने सांगता
पारंपरिक पूजा व विधी पार पडल्यानंतर उपस्थितांसाठी पुरणपोळीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले. कुटुंबीय, शेतकरी, व्यापारी, नागरिक तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी या भोजनाचा आस्वाद घेतला. त्यामुळे धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक सलोखा आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. दुष्काळाच्या प्रतिकूल परिस्थितीतही सावंत परिवाराने शंभर वर्षांची परंपरा अखंडित ठेवत साजरा केलेला बैलपोळा हा करमाळ्याच्या समृद्ध ग्रामीण संस्कृतीचा आणि पशुधनाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा प्रत्यय देणारा ठरला. पूर्वजांनी सुरू केलेली परंपरा पुढील पिढीकडे सोपविताना सावंत परिवाराने पशुधनाचा सन्मान, शेतकरी संस्कृतीचे जतन आणि परंपरेची जपणूक करण्याचा संदेश या उत्सवातून दिला.
