उजनी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या 30 गावांच्या समस्या बाबत 4 डिसेंबर रोजी आढावा बैठक…


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२८) : उजनी धरणाच्या बांधकामानंतर करमाळा तालुक्यातील 30 गावे पुनर्वसित झालेली आहेत, या गावांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून 18 नागरी सुविधांचे लाभ मिळणे आवश्यक होते, परंतु त्यापैकी अनेक गावांमध्ये अद्यापही हे लाभ मिळालेले नाहीत, या गावांच्या समस्यांबाबत येत्या 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता करमाळा येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

ही आयोजित केलेली बैठक 20 ऑक्टोबर 2023 रोजी होणार होती, परंतु ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे सदर बैठक स्थगित करण्यात आली होती, ती बैठक आता होणार असल्यामुळे पुनर्वशीत गावांच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आम.शिंदे म्हणाले की, जानेवारी 2023 मध्ये आपण करमाळा तालुक्यांमध्ये गावभेट दौरा आयोजित केलेला होता. या गाव भेट दौऱ्यात प्रत्येक गावातून आलेल्या समस्यांची नोंदणी केली गेली होती. विशेषतः उजनी धरणाच्या बांधकामानंतर करमाळा तालुक्यातील पुनर्वसीत गावांच्या अनेक समस्या लोकांनी मांडल्या आहेत.

या समस्या सोडवण्यासाठी पुनर्वसन विभागाकडे आपण जून 2023 मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार सदर बैठक बोलावली असून या बैठकीसाठी वांगी नं.1,वांगी नंबर 2, वांगी न. 3, वांगी नं.4, भिवरवाडी ,दहिगाव, बिटरगाव, कुगाव, चिखलठाण नं.1, चिखलठाण न. 2, ढोकरी, पारेवाडी, केतुर नं.1, केतुर नंबर 2, पूर्व सोगाव, पश्चिम सोगाव,उंदरगाव, गोरेगाव, रिटेवाडी, कविटगाव, सांगवी क्र.1, सांगवी क्र.2, कंदर, पोमलवाडी ,खातगाव नं.1, खातगाव नं.2, कात्रज, नेमतवाडी, टाकळी, कोंढार चिंचोली आदी गावातील नागरिकांनी त्यांच्या समस्यांसह बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!