५० वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली – महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा स्नेहमेळावा..! -

५० वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली – महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा स्नेहमेळावा..!

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी): “जुने दिवस परत येत नाहीत, पण त्या आठवणी मात्र काळजाच्या कोपऱ्यात कायम राहतात…” अशाच आठवणींना उजाळा देत म.गां. विद्यालयाचे १९७५ चे एस.एस.सी. (११ वी) बोर्डाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि ११ जून हा दिवस एक अभूतपूर्व स्नेहसंमेलनाचा सोहळा ठरला.

११ जून रोजी सकाळी ९.३० वाजता उत्साही वातावरणात स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम शिक्षक आर.आर.मोरे सर, एस.एम.शिंदे सर, जाधव सर, विधाते सर, मोटे सर आणि सोनी मॅडम यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. त्यानंतर वाद्यांच्या गजरात आणि टाळ्यांच्या गडगडाटात माजी विद्यार्थी रॅलीसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत गेले आणि आपल्या विद्यार्थी जीवनाच्या आठवणींचा एक नवा अध्याय लिहिला.

या मैत्री सोहळ्याचे पुढचे पर्व “राजयोग हॉटेल”च्या सभागृहात पार पडले. इथे मनोगतांच्या माध्यमातून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भावनांनी भारावलेली मने, डोळ्यांतून ओघळणारे अश्रू, आणि हसतमुख आठवणींनी सजलेला तो क्षण उपस्थित सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी गाणी, अभंग, कविता, बासरी वादन अशा कलाविष्कारातही मनमुराद आनंद लुटला. वयाच्या पासष्टीनंतरही तरुणाईचा उत्साह आणि मैत्रीचा ओलावा अनुभवायला मिळाला. स्नेहमेळाव्याची सांगता एकत्रित स्नेहभोजनाने झाली.

या कार्यक्रमाच्या यशामध्ये नागेश माने, किरण यादव, सोमनाथ चिवटे, मोहन देवी, सतिश शीलवंत, भारत वांगडे, विजया कोग्रेकर- महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.”शाळा संपली, वर्ग सुटला, पण ही मैत्री मात्र अजूनही तशीच घट्ट आहे” – हेच या स्नेहमेळाव्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!