प्रशासनाच्या आश्वासनानंतर कुगाव – चिखलठाण रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील कुगाव – चिखलठाण रस्त्याची दुर्दशा झाली आहे याचे काम त्वरित चालू व्हावे यासाठी चिखलठाण व कुगाव या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी २२ जुलै पासून उपोषण सुरू केले होते. यामध्ये सचिन अनंतराव गावडे, शंकर रामचंद्र बोंद्रे, अविनाश मारुती सरडे, योगेश दत्तात्रय सरडे हे युवक उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळी तहसीलदार शिल्पा ठोकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी भेट देऊन काम उद्यापासून लगेच व उर्वरित पावसाची उघडीप मिळाल्यानंतर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर युवकांनी उपोषण सोडले.

यावेळी धुळा भाऊ कोकरे, मंगेश बोंद्रे, मारुती गुटाळ, उपसभापती दत्ता सरडे, महादेव पोरे, महादेव कामठे, कैलास बोंद्रे, अक्षय सरडे, मारुती गावडे, इनुस सय्यद, महादेव अवघडे, बापू सरडे, विजय कोकरे, राणा वाघमारे, शरद सपाटे, जयसिंग पाटील यांच्यासह कुगाव आणि चिखलठाण चे ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुगाव ते चिखलठाण या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. प्रस्थापितांनी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या विकास कामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केला आहे. सत्ताधाऱ्यांचे हे मोठे अपयश म्हणावं लागेल. मात्र युवकांची फळी अशीच मजबूत झाली तर शासन आणि प्रशासनाला वाकवायला वेळ लागत नाही. युवकांनी चळवळ हातात घेतल्यामुळे प्रशासन वठणीवर आले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी करमाळा तालुक्याला अशाच युवकांची गरज आहे.
– अतुल खूपसे-पाटील, अध्यक्ष, जनशक्ती संघटना



