अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीपेक्षा राज्याचे नुकसान – विरोधक झाला कमकुवत..

करमाळा / संदेश विशेष प्रतिनिधी :
करमाळा (ता.2) : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये बंड झाले आणि अजितदादा पवार चक्क विरोधीपक्ष पदावरून उपमुख्यमंत्री झाले. युध्दात, प्रेमात व राजकारणात सर्व माफ असते असे म्हटले जाते.. म्हणून कोणतेही व कसेही निर्णय घेऊन चालत नाही. श्री.पवार विरोधातून सत्तेत गेले पण त्यामुळे राजकारणाचा समतोल बिघडला आहे. विरोधीपक्ष कमकुवत झाला आहे.
अजितदादा पवार हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असताना राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देवून त्यावेळी बंड थोपवले होते. पण काही काळ जाताच शरद पवार यांना समजण्याच्या आतच अजितदादांनी बंड तर केलेच पण उपमुख्यमंत्रीपद हासील केले. अर्थातच हा बहुमान अजितदादाचा नसून शरद पवार यांना धक्का देण्यासाठीच भाजपाने केलेला मुत्स्दीपणा आहे. राज्यातील राजकारणात भाजपाने एका दगडात दोन पक्षी वेचले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निर्बंध घातले व शिवसेनेनुसार राष्ट्रवादीही तोडली आहे. अगामी निवडणुकीत प्रमुख विरोध संपल्याने भाजपा हाच मोठा पक्ष होणार असून, विरोधक दुबळे राहतील असे हे नियोजन आहे. सत्ताकारणात एकमुखी सत्ता व विरोधक दुबळा असेल तर मनमानी होते. लोकशाहीचे महत्त्व दुबळे होते. शिवसेनेत दोन गट पडल्याने तो पक्ष कमकुवत झाला आहे. आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने त्या पक्षाची अवस्था जवळपास तशी होवू शकते. पण शरद पवार या स्थितीत नेमके काय करणार? पक्षाला अडचणीतून बाहेर कसे काढणार याकडे राज्याचेच नव्हेतर संपुर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
अजितदादा यांनी सद्यस्थिती पाहिली,येणारी संकटे टाळली पण मतदारांना व पाठीराख्यांना अडचणीत टाकले आहे. एकंदरीत हे बंड केवळ राष्ट्रवादीला अडचणीत आणणारे नाहीतर लोकशाहीलाच अडचणीत आणणारे आहे.

