करमाळ्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयात नागरिकांना ‘तारीख पे तारीख’ – अतुल खुपसे पाटील

करमाळा(दि. २२): करमाळा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील प्रमुखांना दुसऱ्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी असल्याने नागरिकांना ‘तारीख पे तारीख’ अशा अनुभवाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना खूपसे पाटील म्हणाले की, “निबंधक कार्यालयात विविध गावांतील संस्थांच्या परवानग्या, चालू असलेल्या केसेस, सहकारी संस्थांच्या तक्रारी, शिक्षक सहकारी संस्था व पतसंस्थांच्या समस्या प्रलंबित आहेत. परंतु कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई अथवा चौकशी होत नसून, नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.”

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा नागरिकांवर व संस्थांवर प्रतिकूल परिणाम होत असून, “साहेब नाहीत, उद्या या, चार दिवसांनी या” अशी उत्तरे ठरलेली झाली आहेत. यामुळे लोकांच्या कामांचा खोळंबा होत असून प्रशासन लोकांसाठी की निव्वळ दाखवण्यासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे, असेही खूपसे यांनी नमूद केले.

खूपसे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास जनशक्ती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन छेडून सरकारला जागं करेल.”
“करमाळा तालुक्याला पूर्णवेळ सहाय्यक निबंधक मिळावा, ही वेळेची गरज असून, ही मागणी लवकरात लवकर मान्य झाली पाहिजे,” असेही ते म्हणाले.





