चिखलठाण येथील 'कोटलिंग मंदिर' परिसराची 'योद्धा करिअर अकॅडमी'च्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता - ग्रामस्थांचा सहभाग.. - Saptahik Sandesh

चिखलठाण येथील ‘कोटलिंग मंदिर’ परिसराची ‘योद्धा करिअर अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता – ग्रामस्थांचा सहभाग..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : चिखलठाण (ता.करमाळा) येथील कोटलिंग देवस्थान यात्रेनंतर अस्वच्छ झालेल्या मंदीर परिसराची जेऊरवाडी येथील योद्धा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. बाहेगावचे लोक स्वच्छतेसाठी प्रयत्न करत असलेले पाहून यात्रा समितीचे सदस्य व ग्रामस्थांनीही घेतले हातात झाडू एरव्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून होऊ शकणार नाही अशी स्वच्छता श्रमदानातून करून ॲकडमीच्या या उपक्रमाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.


करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील कोटलिंग यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते या यात्रेला दोन लाखापेक्षा जास्त भाविक येतात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये पाळणे, रसवंती ग्रह, हॉटेल्स्, खेळणी, विविध खाद्यपदार्थ व शीतपेयांचे स्टॉल आशा व्यावसायिकांनी‌आपली दुकाने थाटलेली असतात मोठी उलाढाल या काळामध्ये होते मात्र उजनी धरण काठावर असलेल्या या 60 ते 70 एकर मोकळ्या मैदानात यात्रेनंतर मोठी अस्वच्छता जाणवते यात्रेमधील शिल्लक राहिलेले खराब झालेले खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या बॉटल्स कॅरीबॅग कागद अशा विविध वस्तू सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेल्या असतात त्याची दुर्गंधी सर्वत्र सुटलेली असते.

अशावेळी या परिसराची स्वच्छता करणे मोठे जिकिरीचे होते रोजंदारीवर मजूर लावूनही चांगली स्वच्छता होत नाही परंतु करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील सुभेदार मेजर विलास नाईकनवरे व हांबिराव नाईकनवरे यांनी जेऊरवाडी येथे सुरू केलेल्या योद्धा करिअर अकॅडमीच्या १२७ विद्यार्थ्यांनी यात्रेनंतर दोन दिवसांनी या ठिकाणी येऊन या परिसराची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. ॲकडमीचे मार्गदर्शक नवनाथ नाईकनवरे शिक्षक निलेश कदम, सागर जावरे,अमित पाटील राहुल कावळे, वैभव नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हातात झाडू घेऊन स्वच्छता सुरू झाल्यानंतर येथील यात्रा कमिटी व ग्रामस्थांनीही या स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवला चार ते पाच तास श्रमदान करून पंधरा ते वीस ट्रेलर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली या संपूर्ण परिसराची त्यांनी स्वच्छता केली.

यात्रा कमिटीच्या वतीने श्रमदानासाठी आलेल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली भोजनानंतर उजनी धरणामध्ये जलविहार करून निसर्गाच्या सानिध्यात जल पर्यटनाचाही आनंद या विद्यार्थ्यांनी घेतला यानंतर कोणत्याही यात्रेत किंवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर तेथे अस्वच्छता करताना आपण दहा वेळा नक्कीच विचार केला पाहिजे ही शिकवण आजच्या स्वच्छता उपक्रमातून मिळाल्याचे या विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले.

कोटलिंग यात्रा झाल्यानंतर रोजंदारीवर मजूर लावून आम्ही चार पाच दिवस या परिसराची स्वच्छता करून घेत होतो. एरव्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून होऊ न शकणारी स्वच्छता योद्धा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तीन ते चार तासात केली ग्रामस्थांचाही याच्यामध्ये सहभाग होता या उपक्रमाच्या माध्यमातून त्याची खरी सेवा काय असते याचा आदर्शच या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे. – चंद्रकांत सरडे (माजी सरपंच चिखलठाण)

कोटलींग यात्रा कालावधीमध्ये दर्शनासाठी ॲकडमीमधील चार पाच विद्यार्थ्यांबरोबर आम्ही कोटलिंग मंदिरावर आलो होतो यावेळी सहज उजनी धरण काठावरील या निसर्ग रम्य परिसरामध्ये या यात्रेमुळे फारच अस्वच्छता होत असल्याचे आम्हाला दिसले यावेळी या ठिकाणच्या स्वच्छतेचा विषय निघाला आल्यानंतर आपण त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी येऊ असे आम्ही ठरवले होते त्यानुसार आम्ही या ठिकाणी आलो ग्रामस्थ व यात्रा समितीच्या वतीने आम्हाला यासाठी सहकार्य मिळाले यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. – नवनाथ नाईकनवरे मार्गदर्शक (योद्धा करिअर अकॅडमी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!