केम येथील रेल्वे रोड क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्याची मागणी

केम(संजय जाधव): केम येथील रेल्वे रोड क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सारिका कोरे यांनी केली असून, यासंदर्भात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे अकलूज येथे निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केम गावाची लोकसंख्या सुमारे १५ हजाराच्या आसपास असून गाव कुंकवाच्या उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. सध्या रेल्वे क्रॉसिंगमुळे गाव दोन भागांत विभागले गेले आहे. एक भागात मुख्य गाव तर दुसऱ्या भागात वाड्या-वस्त्या आहेत. या रेल्वे मार्गावर असलेल्या नाल्यातून करमाळा– कुर्डूवाडी– परंडा मार्ग जात असून पावसाळ्यात नाल्यात पाणी साचते. परिणामी वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

विशेषतः मोठ्या वाहनांना नाल्यातून जाणे कठीण होते. याचा फटका केममधील कुंकू कारखान्यांना बसत असून कच्च्या मालाच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. गाड्या लांबून आणाव्या लागतात. परिणामी भाडे जास्त लागते. हे कारखानदारांना परवडत नाही. त्यामुळे काही कारखाने इतर शहरांकडे स्थलांतरित होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

केममध्ये सध्या सुमारे २५ ते ३० कुंकू कारखाने कार्यरत असून २०० ते २५० स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अशा स्थितीत उड्डाणपूल उभारल्यास गावाचा शाश्वत विकास साधता येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
नुकताच महाराष्ट्र शासनाने हॅम अंतर्गत नगर सोलापूर जोडणारा रस्ता वेणेगाव-केम-निंभोरे-कोंढेज-राजुरी हा मार्ग मंजूर केला आहे. त्यामुळे आता रेल्वे उड्डाणपूलाची गरज आहे.
पावसाळ्यात या रेल्वे पुलाखाली पाणी साचत असल्याने वाड्या वस्त्यांवरील लोकांना गावात रात्री-अपरात्री येताना गुडघाभर पाण्यातून यावे लागते. त्यामुळे विंचू काटा यांचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी उड्डाण पुलाची गरज आहे तरी खासदार साहेबांनी या कडे लक्ष घालावे.
– सुदर्शन तळेकर, केम



