श्रीदेवीचामाळ येथील रस्ता, भक्त निवास बांधकाम निकृष्ट दर्जाचे – संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – श्री क्षेत्र देवीचामाळ (ता.करमाळा) येथील कमलाभवानी मंदिर परिसरात (कमला देवी मंदिर ते खंडोबा मंदिर) केलेला रस्ता, नवीन बांधकाम चालू असलेले भक्त निवास व परिसरात टाकण्यात आलेले सिमेंटचे ब्लॉक आदी सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्री देवीचामाळ ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष जयेंद्र कमलाकर पवार यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की मी श्रीदेवीचामाळ येथील रहिवासी असून कमलाभवानी मंदिर परिसरात विविध चालू असलेली कामे ही निकृष्ट दर्जाची आहेत. या विषयी संबंधित अधिकाऱ्यास मी वारंवार कामाचा दर्जा सुधारण्यासाठी विनंती केली परंतु त्यांनी अरेरावीची भाषा वापरली व तुमच्या पद्धतीने काय करायचे ते करा असे बोलण्यात आले. यामध्ये झालेल्या कामाचा दर्जा तपासून व सदरील अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व सदरील काम पूर्ण होण्याची तारीख संदर्भात स्पष्टता द्यावी अशी मागणी श्री.पवार यांनी निवेदना द्वारे, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे २८ नोव्हेंबर रोजी केली आहे.

याविषयी संदेश प्रतिनिधीशी अधिक माहिती देताना श्री. पवार म्हणाले की कमलाभवानी देवी मंदिर ते खंडोबा मंदिर केलेला रस्ता अत्यंत हलक्या व निकृष्ट दर्जाचा केलेला आहे. ह्या रस्त्यावर लवकरच खड्डे पडण्यास सुरवात होणार आहे. एखादा जोराचा अवकाळी पाऊस आला तर ह्यावरील खडी बाजूला निघून जाईल. याबरोबरच श्रीदेवीचा माळ येथे भक्त निवासाचे काम सुरू आहे. हे काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात बांधण्यात येत आहे. बांधकामात पुरेसे सिमेंट वापरले जात नाही. या बांधकामाचे जे कॉलम तयार केले आहेत ते देखील चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले. एक पिलर पूर्णपणे बाहेर आला होता. त्याला फोडून दुरुस्ती करण्यात आला आहे. बांधकामाच्या पायाला (बेस) पुरेसे सिमेंट वापरण्यात आले नसून हात लावला तर खडी बाहेर येत आहे. याबरोबरच परिसरामध्ये जे सिमेंटचे ब्लॉक टाकलेले आहेत ते काही ठिकाणी खालची फरशी न काढता त्यावरच ब्लॉक टाकलेले आहेत त्यामुळे हे ब्लॉक मजबूतपणे बसले नसून कधीही निघू शकतात. अशा प्रकारे विविध कामे ही निकृष्ट दर्जाची होत असून संबधित ठेकेदारास/अधिकाऱ्यास वारंवार वारंवार कामाचा दर्जा सुधारण्यासाठी विनंती केली परंतु त्यांनी अरेरावीची भाषा वापरली व तुमच्या पद्धतीने काय करायचे ते करा असे बोलण्यात आले.

मी २८ नोव्हेंबर रोजी केलेल्या निवेदनानंतर देखील जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अद्याप पाहणी करण्यात आलेली नाही. मी कलेक्टर ऑफिसला देखील याविषयी तक्रार केली आहे.








