शिक्षक आत्महत्यांना आळा घालण्यासाठी ‘दिलासा समिती’ स्थापन करण्याची मागणी

0

करमाळा (दि.२२ एप्रिल) – राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर ‘दिलासा समिती’ स्थापन करण्याची मागणी महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

झिंजाडे यांच्या मते, महाराष्ट्रात सुमारे पाच हजार विनाअनुदानित शाळांमध्ये सुमारे ४९ हजार कर्मचारी कार्यरत असून त्यांच्यावर शाळा चालकांकडून मानसिक व आर्थिक छळ होतो. वेळेवर वेतन मिळत नाही, शंभर टक्के अनुदानासाठी केलेल्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होते आणि काही वेळा कोणतेही कारण न देता शिक्षकांना कामावरून कमी केले जाते, असे आरोप त्यांनी केले आहेत.

अलीकडच्या काळात बीड, परभणी आणि वाशिम जिल्ह्यातील दोन शिक्षक आणि एका शिपायाने अशाच जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती झिंजाडे यांनी दिली. अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘दिलासा समिती’ स्थापन करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

या समितीत महसूल, शिक्षण व पोलीस विभागाचे प्रतिनिधी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा प्रतिनिधी, एक डॉक्टर, एक सामाजिक कार्यकर्ता, एक महिला वकील, दोन शिक्षक आणि दोन महिला शिक्षक प्रतिनिधी (मुख्याध्यापक वगळून) यांचा समावेश असावा. समितीने दर तीन महिन्यांनी बैठका घ्याव्यात व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

“संस्थाचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शिक्षकांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ही समिती अत्यावश्यक आहे,” असे झिंजाडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!