रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार

करमाळा (दि १५): निलज येथे गुरुवारी (दि. १२) रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीची महत्वपूर्ण बैठक ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत योजनेतील तांत्रिक अडथळे, प्रशासनिक प्रक्रिया, आणि गावा-गावात जनजागृती करत हक्काचे पाणी मिळवण्यासाठी पुढील तीव्र लढ्याचे नियोजन करण्यात आले.

या बैठकीत रिटेवाडी संघर्ष समितीचे अभ्यासक व पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे यांनी सविस्तर अहवाल सादर केला. त्यांनी सांगितले की, “ही योजना मार्गी लागावी यासाठी गावा-गावात जाऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार असून, लवकरच मोठ्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.”

बैठकीत पिंपळवाडीचे सरपंच मदन पाटील, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, आणि बाळासाहेब टकले यांनीही आपले मार्गदर्शन दिले. यावेळी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीचे प्रास्ताविक अंगद देवकते यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पत्रकार राजेश गायकवाड यांनी मानले. निलज ग्रामस्थांनी या लढ्यात सक्रिय सहभागी राहण्याचे आश्वासन दिले. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले की, लवकरच योजनेच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती मोहिम राबवण्यात येणार आहे, जेणेकरून हा लढा अधिक व्यापक आणि यशस्वी होईल.




