निराधारांना अन्नदानाबरोबरच निवाऱ्याची सोय आवश्यक श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम अनुकरणीय : माजी आमदार जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.19) : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गणेश चिवटे यांनी गेल्या नऊ वर्षापासून निराधारांना जे अन्नदान दिले जात आहे; तो उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या निराधारांना यापुढे अन्नदानाबरोबरच निवाऱ्याची सोय आपण सर्वजण मिळून करू; असे आश्वासन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने गेल्या नऊ वर्षापूर्वी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने निराधारांना अन्नदान करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नाना महाराज पांडेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत साहित्याचे अभ्यासक ॲड.डॉ.बाबुराव हिरडे हे होते. पुढे बोलताना माजी आमदार जगताप म्हणाले, की गणेश चिवटे हे सामाजिक काम करताना स्वत:च्या खिशातून खर्च करतात. ही भुमिका परमेश्वराच्या लक्षात आल्याने त्यांचे हातून हे काम केले जात आहे. कारण जो दुसऱ्याचं खातो त्याचे हातून असे काम होणार नाही. गणेश चिवटे हे चांगल्या उद्दीष्टानं अन्नदान, विद्यार्थ्यांना भात-भाजी, गोरगरीबांसाठी सामुदायिक विवाह असे उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे त्यांना जनमाणसातून मोठे पाठबळ मिळत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे, संत साहित्याचे अभ्यासक ॲड.बाबुराव हिरडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक भीष्माचार्य चांदणे यांनी केले तर आभार जय श्रीराम विलास जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.भगवान गिरी यांनी केले.



