‘2024’ मध्ये जनतेने संधी द्यावी – एकदाही मुख्य कॅनॉल रिकामा दिसणार नाही – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉल मध्ये वर्षभर पाणी राहिल, सन २०२४ मध्ये जनतेने संधी द्यावी, एकदाही मुख्य कॅनॉल रिकामा दिसणार नाही, वर्षभर दहिगाव उपसाचे पाणी या चारीत दिसेल असे आश्वासन नारायण पाटील यांनी दिले, सरपडोह येथील सभेत ते बोलत होते. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी सरपडोह येथे गावभेट दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी आयोजित बैठकीस सरपंच पांडूरंग वाळके,सभापती अतूल पाटील, माजी सरपंच कांतीलाल घोगरे, माजी सरपंच दादा पाटील, सोसायटी सदस्य सुभाष पवार, माजी सरपंच महादेव नलावडे, रामभाऊ बोंद्रे, श्रीरंग गवारे, नाथराव रंदवे, रामदास पवार, रामभाऊ मोरे, मारुती यादव, पोलीस पाटील अंकुश खरात, मनोहर रंदवे, जगन्नाथ गायकवाड, भानुदास शिंदे, सचीन मस्कर, स्वीय सहाय्यक सुर्यकांत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की, दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या हक्काचे १.८० टि एम सी पाणी या चार वर्षात एकाही वर्षी उचलले गेले नाही. तर दहिगाव येथील सहा पंप आणि कुंभेज येथील चार पंप असे सर्व पंप एकाच वेळी चालवताना पहायला मिळाले नाही. यामुळे पुर्वभागाचे हक्काचे पाणी उजनीत शिल्लक राहिले. यामुळे मग इतर आमदारांनी अगदी अक्कलकोट पर्यंत उजनीचे पाणी पळवून नेले.

२०२४ मध्ये जनतेने संधी द्यावी, एकदाही तुम्हाला मुख्य कॅनॉल रिकामा दिसणार नाही. वर्षभर दहिगाव उपसाचे पाणी या चारीत दिसेल. चार चार महिन्याची आवर्तने सलगपणे चालू ठेवण्याची धमक फक्त नारायण पाटील यांच्या मध्येच आहे हे मी कृतीतून सिद्ध करुन दाखवेन. यामुळे पुर्वभागातील शेतकऱ्यांनी सत्तांतर करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. नाथराव रंदवे यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच पांडुरंग वाळके यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!