करमाळा शहरातील रस्ते-पाणी- स्वच्छतेचे प्रश्न न सोडविल्यास 'जवाब दो' आंदोलन छेडणार -

करमाळा शहरातील रस्ते-पाणी- स्वच्छतेचे प्रश्न न सोडविल्यास ‘जवाब दो’ आंदोलन छेडणार

0
संग्रहित छायाचित्रे

करमाळा (दि. 27) : शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने करमाळा नगरपरिषदेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या बागल गटाच्या माजी नगरसेविका सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी येत्या आषाढी एकादशीपूर्वी समस्या न सुटल्यास ‘जवाब दो’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

नगरपालिका नागरिकांकडून विविध कर वसूल करत असताना मूलभूत सुविधा मात्र देण्यात अपयशी ठरत आहे. अपुरी सेवा पुरवूनही वेळेवर कर न भरल्यास व्याज आकारण्याची नगरपालिकेची भूमिका अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

सौ. कांबळे म्हणाल्या, “आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातून विविध भागातील वारकरी मोठ्या संख्येने पायी वारी करताना दिसतात. मात्र नगरपालिकेला याचे भान नसल्याचे स्पष्ट होते.” सिद्धार्थनगर व सुमंतनगर परिसरात गटारांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा निकृष्ट पुरवठा, नाल्यांची वेळेवर सफाई न होणे, आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत, असे त्यांनी नमूद केले.

सिद्धार्थनगरमध्ये अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून पाणीपुरवठ्याच्या जुनाट व गळक्या पाईपलाइनची तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे. पावसाळ्यात नाल्यांमधील घाण थेट रस्त्यावर टाकली जात असल्याने दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो.

केत्तूर नाका ते रावगाव नाका रस्त्याची बिकट अवस्था ही वारकऱ्यांनाही अडचणीची ठरत आहे. निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग असल्यामुळे या मार्गाची तातडीने डागडुजी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दलित स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

“वरिल सर्व मागण्या नगरपालिकेने आषाढी एकादशीच्या आत पूर्ण कराव्यात, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून ‘जवाब दो’ आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा सौ. सविता कांबळे यांनी दिला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!