कोंढार-चिंचोलीत श्रीदत्त जन्मोत्सव समितीचा आदर्श उपक्रम-
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला सन्मान

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३०:कोंढार-चिंचोली येथे श्रीदत्त जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित जाहिर व्याख्यान व सामाजिक पुरस्कार प्रदान सोहळा २०२५ उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्ते संजय अप्पा साळुंके यांच्या संकल्पनेतून व दातृत्वातून सलग १२ वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या श्रीदत्त जन्मोत्सव मंडळाने यंदाही पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी हा उपक्रम साकार केला.

या सोहळ्यात करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. विशेष पुरस्कार म्हणून पक्षीमित्र प्रा. कल्याणराव साळुंके व आदर्श शिक्षक प्रा. बाळकृष्ण लावंड यांना श्री दत्त सेवाभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुयश निलकंठ शिंदे, सलोनी सतीशराव भोसले, डॉ. कु. वैष्णवी मुरलीधर गलांडे, अनिकेत दत्तात्रय तावरे, बिनाली बाळासाहेब कांबळे, ॲड. अभिजीत सुरेश कांबळे, ऋतुजा तात्यासाहेब कांबळे, स्वराज बाळासाहेब बोडके, गणेश मनोहर तावरे, हनुमंत गलांडे, ॲड. सौरभ संतोष भोसले यांना विशेष स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा. राजकुमार मस्कर होते. यावेळी आयोजक संजय अप्पा साळुंके, प्रा. जयेश पवार, प्रा. विष्णू शिंदे, पाटबंधारे विभागाचे अभियंते अतुल दाभाडे, गावचे सरपंच-उपसरपंच, पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या निमित्ताने सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी “आम्ही तुफानातील दिवे” या विषयावर अभ्यासपूर्ण व प्रबोधनात्मक व्याख्यान सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानानंतर रिलस्टार कु. रितिका सचिन जांबले पाटील या विद्यार्थिनीने सादर केलेल्या नृत्यकलेने कार्यक्रमाला रंगत आणली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी केले. मान्यवरांचा परिचय अनिकेत कांबळे, सूत्रसंचालन प्रा. सुहास गलांडे यांनी केले तर आभार शेतकरी संघटनेचे नेते निळकंठ शिंदे यांनी मानले.
