आषाढी वारीपूर्वी करमाळा शहरात रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा – भाजपची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी

करमाळा (दि. 17): शहरातील आणि लगतच्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली असून, रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत, त्याठिकाणी तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याची गरज आहे,बाहेरील रस्त्यांच्या कडेला काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे अपघात घडू शकतात. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, अशा ठिकाणी कायम स्वरुपी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी भाजपा चे सरचिटणीस जितेश कटारिया यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

आषाढी एकादशी निमित्त करमाळा शहर व परिसरातून अनेक दिंड्यामधून लाखो वारकरी भाविक भक्त तसेच श्री संत निवृत्ती महाराजांची पालखी देखील शहरातून हजारोंच्या वारकऱ्यांसह पंढरपूरच्या दिशेने जातात. याशिवाय पंढरपूरला जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी नगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी फिरते शौचालय ,त्या कालावधीत होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन, पाणी पुरवठा, नगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय सेवा आणि त्यांच्या निवाऱ्याचे योग्य ते नियोजन तातडीने करून तसे फलक वारकऱ्यांना दिसतील अशा दर्शनीय भागात लावावेत,त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी नगरपालिका प्रशासनाने घ्यावी अशी मागणी भाजपा चे सरचिटणीस जितेश कटारिया यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दिपक चव्हाण,ज्येष्ट नेते संजय घोरपडे,बाळासाहेब कुंभार,जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार,जिल्हा सरचिटणीस किरण बोकण,शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण,मनोज कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.




