देवळाली व विहाळ येथील शेळी, वासरावरील हल्ले बिबट्याचेच – वनविभागाकडून झाली पाहणी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : देवळाली येथे शेळीवरील झालेला हल्ला हा बिबटयाचाच होता या वनविभागाच्या निष्कर्षानंतर आता विहाळ येथील वासरावर झालेला हल्ला देखील बिबट्याचा आहे असा निष्कर्ष वन विभागाने पाहणी करून काढला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाचे वतीने करण्यात आले आहे.
देवळाली (ता.करमाळा) येथे मंगळवारी (ता.७) रात्री एका शेळीवर हल्ला झाला होता. त्यानंतर वन विभागाने देवळाली येथे जाऊन हल्ला झाल्याच्या ठिकाणी पावलांचे ठसे घेतले व ते ठसे बिबट्याचेच असल्याचा निष्कर्ष काढला होता.
देवळाली येथील हल्ल्यानंतर मंगळवारीच विहाळ (ता. करमाळा) येथील पंढरीनाथ गाडे यांच्या शेतात बांधलेल्या वासरावर देखील हल्ला झाला होता. आज (दि.९) वनविभागाने येथील परिसराची तपासणी केल्यानंतर व ठसे पाहिले असता, हे ठसे बिबट्याचेच असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
मोहोळ वनविभागाचे वननिरीक्षक एस. आर. कुरुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पाहणी केली. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग योग्य ते नियोजन करत असून तोपर्यंत करमाळा तालुका व परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विहाळ येथील पंढरीनाथ गाडे यांचे दिड वर्षांचे वासरू होते. मंगळवारी(दि.७) रात्री त्याला बिबट्याने पकडून गळा आवळून मारले व काल बुधवारी त्याच बिबट्याने त्याला खाल्लेले दिसून आले.