मकाई कारखाना ऊस बिलासाठी सामुहिक आत्मदहन आंदोलन तुर्त स्थगित – ॲड. राहुल सावंत

करमाळा (संदेश प्रतिनिधी)- येथील तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी मकाईच्या थकीत ऊस बिला साठी जवळपास 400 शेतकऱ्यांचे सामुहिक आत्मदहन आंदोलन जाहीर करण्यात आले होते. आंदोलनासाठी कार्यकर्ते जमा झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ,तहसीलदार शिल्पा ठोकडे पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आंदोलन कर्ते शेतकर्यांना मकाई कारखाना बँक कर्ज प्रकरण दि. 31 जानेवारी 2024 रोजी होत आहे. यामध्ये बँक कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांची थकीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले त्यामुळे सदरचे आंदोलन तुर्त स्थगित करण्या आले आहे,अशी माहिती निमंत्रित सदस्य -जिल्हा नियोजन समिती आणि पंचायत समिती माजी सदस्य ॲड .राहुल सावंत यांनी दिली.
दिनांक २५ रोजी करमाळाचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे रुजू झाल्यानंतर शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आत्मदहन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नियोजनपूर्वक बंदोबस्ताची तयारी केली होती. यानुसार प्रजासत्ताक दिना दिवशी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती. आदल्या दिवशी प्रशासनाने बोलावलेले बैठकीकडे आंदोलकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी आंदोलन होणार असे गृहीत धरून जादा पोलिसांची कुमक मागवण्यात आली होती. शिवाय दंगाकाबू नियंत्रण पथक, अग्निशामक पथक आणि डॉक्टर , सरकारी व खाजगी रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

तहसील कार्यालया समोर हळूहळू आंदोलनकर्ते शेतकरी तसेच ॲड. राहुल सावंत, प्रा. रामदास झोळ , दशरथ आण्णा कांबळे, रवींद्र गोडगे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र होऊ लागले. सुरुवातीला ॲड. राहुल सावंत यांनी मकाई कारखाना प्रशासना च्या विरोधात घोषणांनी तहसील कार्यालय दणाणून सोडले. यावेळी आंदोलनाची दखल घेऊन लगेच तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक घुगे यांनी आंदोलन प्रतिनिधींना चर्चेसाठी विनवणी केली परंतु आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांना चर्चेला बाहेर बोलावण्याचा आग्रह धरला व बाहेरच आंदोलन सुरू ठेवले., ऊस बील जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार असल्याची भूमिका घेतली.
दरम्यान दुपारी एकच्या सुमारास काही कारखान्याचे प्रतिनिधींनी तहसीलदार यांच्याकडे पत्र दिल्याचे सांगण्यात आले… पण आंदोलनकर्ते यांनी या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या हातात काही नाही, त्यांना परत पाठवा त्यानंतरच आम्ही अधिकाऱ्यांंसोबत चर्चा करायला येऊ ,अशी भुमिका घेतली.यावेळी या कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर पाठवले. त्यानंतरच आंदोलन कर्ते यांचे शिष्टमंडळ दुपारी सव्वा दोन वाजता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना भेटले.आंदोलकांना विश्वासात घेऊन जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून ऊस बिलाबाबत चर्चा केली आणि त्यांनी 31 जानेवारी रोजी बँक प्रकरण मंजूर होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम जमा करण्यात येईल आणि कर्ज मंजूर न झाल्यास कडक कारवाई करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिल जमा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले तसेच आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी सरकारी वकिलांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे हे आंदोलन तुर्त स्थगित करण्याचे अवाहन दशरथराव कांबळे व प्रा. रामदास झोळ यांनी केले. त्यानंतर सदरचे आंदोलन 31जानेवारी 2024 पर्यंत स्थगित केले आहे. यावेळी गणेश वाळुंजकर, हरिदास मोरे , शहाजी माने , काकासाहेब गपाट , ढवळे बोरगाव, ॲड. राहुल सावंत, प्रा. रामदास झोळ , दशरथ आण्णा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
श्री मकाई कारखाना विरोधात च्या शेतकऱ्यांच्या सामूहिक आत्मदहन आंदोलनात चिमुकली जान्हवी राहुल सावंत हिने मोठमोठ्याने घोषणाबाजी केली. तसेच या आंदोलनात महिलाही उपस्थित होत्या. यामुळे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली.

