दहिगाव उपसा सिंचनचे आवर्तन सुरु -आमदार संजयमामा शिंदे

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – उजनी धरण १०० टक्के भरल्याने करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन आज (दि.५) पासून सुरू झाले असून बोगदा व सीना माढा उपसा सिंचन योजनाही कार्यान्वित झाले असल्याचे माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या वर्षी करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उजनी धरणात अवघा 60 टक्के पाणीसाठा झाला होता .याच पाणीसाठ्यावरती गेल्या वर्षी पाणीपुरवठा झाल्यामुळे धरण वजा 60 टक्के पर्यंत गेलेले होते .यावर्षीही करमाळा तालुक्यात अद्यापही सर्वसमान पाऊस झालेला नाही. विशेषतः दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे अशी मागणी आपण यापूर्वीच कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याकडे केली होती. 3 तारखेला जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर पाणी सोडण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार आज पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू केल आहे.
टेल टू हेड पाणी देणार
–एस.के.अवताडे, उप अभियंता कोपरी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12
या ओव्हरफ्लोआवर्तनाचे पाणी टेल टू हेड देणार असून टेल भागातील कमांड मध्ये नसलेली गावे तसेच कमांड मध्ये असलेली गावे अशा सर्व गावांना पाणी दिले जाणार आहे.मलवडी ,वरकुटे, घोटी, निंभोरे, नेरले, लव्हे व साडे या गावांना सुरुवातीला पाणी दिले जाईल.




