यशकल्याणी संस्थेच्या माध्यमातून भविष्यातले शास्त्रज्ञ घडतील - पद्मश्री अरविंद गुप्ता -

यशकल्याणी संस्थेच्या माध्यमातून भविष्यातले शास्त्रज्ञ घडतील – पद्मश्री अरविंद गुप्ता

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : वसंत दिवेकर आणि लीलाताई दिवेकर यांनी ज्या उद्देशाने या संस्थेची निर्मिती केली तो आज सफल होताना दिसतोय,निसर्गातील प्रत्येक गोष्टीत खेळणी लपलेली आहेत,झाडे,पालापाचोळा, कचरा हा खेळणी बनवण्याचा कच्चा माल आहे त्यातून निर्माण झालेली वैज्ञानिक खेळणी गरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलवतील व भविष्यातले शास्त्रज्ञ करमाळ्यात घडतील, असे प्रतिपादन पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी व्यक्त केले.

वसंतराव दिवेकर स्मृतीदिन व यशकल्याणी संस्थेच्या दशकपूर्ती वाटचालीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान संशोधन पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.गुप्ता बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, गेली ५० वर्षे विज्ञानात संशोधन करून जगभर ज्यांनी हजारो शास्त्रज्ञ घडवले अशा पद्मश्री अरविंद गुप्ता यांना पहिला यशकल्याणी राष्ट्रीय विज्ञान संशोधन पुरस्कार २०२३ कार्यक्रमाचे अध्यक्ष, सी-मेट पुणे येथील जेष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.भारत काळे व भारतीय नौसेनेचे रिअर ॲडमिरल रविंद्रजी नाडकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

५० हजार रूपये रोख,स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.आयसर पुणे येथील प्रसिद्ध विज्ञान संशोधक अशोक रूपनर यांना राष्ट्रीय विज्ञान प्रसार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.२५ हजार रूपये रोख,स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.विज्ञानाच्या क्षेत्रात तब्बल २५ संशोधन ग्रंथ लिहीणा-या लेखिका,वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणा-या डाॅ.प्रचिती पुंडे यांना राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आदर्श शाळा चालवून,शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत सर्वोत्कृष्ट शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणा-या गिरधरदास देवी विद्यालयाच्या संचालिका सुनिता कन्हैयालाल देवी यांना पहिल्या करमाळा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुक्ष्मजीव शास्त्रातील योगदानाबद्दल डाॅ.प्रविण देशमुख व मनोज राऊत यांच्या सायन्स वॉल या उपक्रमांना राज्य विज्ञान संशोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आदर्श विज्ञान प्रसार संस्था म्हणून जीवन शिक्षण फाऊंडेशन,क्षितीज ग्रुप व कोंढार चिंचोली शाळेला सन्मानित करण्यात आले.

बालरोगतज्ज्ञ.उदयसिंह गायकवाड,पक्षीमित्र प्रा.कल्याणराव साळुंके,स्त्री रोग तज्ज्ञ डाॅ.निलेश मोटे,सुनिता मोहिते,मेघाली शेटे,मिनल बनसुडे, पल्लवी ढाळे,नयना देशमुख, गीता पवार,सुरताल विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे आदि शिक्षकांना करमाळा विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रिअर ॲडमिरल रवींद्र नाडकर्णी यांनी अरविंद गुप्ता यांचे अभिनंदन करून, त्यांच्या संशोधन कार्यावर प्रकाश टाकत भविष्यातील सैन्यातील करिअर विषयक मार्गदर्शन केले.अशोक रूपनेर यांनी विज्ञान प्रात्यक्षिके दाखवत अभ्यासपूर्ण माहिती देत उपस्थितांची मने जिंकली,पुरस्काराला उत्तर देताना डाॅ.प्रचिती पुंडे यांनी विद्यार्थी,डाॅक्टर,उद्योजक लेखक ते मिसेस युनिव्हर्स पर्यंतचा प्रवास मांडत विज्ञानाचा उपयोग लोकसेवेत होऊ द्या असे आवाहन केले तर डाॅ.सुनिता दोशी यांनी राष्ट्रीय विज्ञान संशोधन प्रयोगशाळांची माहिती देत सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवावी लागेल असे मत व्यक्त करत यशकल्याणी परिवाराचे पुरस्कार देऊन दखल घेतल्याबद्दल आभार मानले.

जीवन गौरव पुरस्कार दिल्यामुळे माझ्या व सहकारी शिक्षकांच्या मनातील आत्मविश्वास वाढला असून शेवटपर्यंत विद्यार्थीहित पाहून तो घडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन प्रा सुनिता देवी यांनी केले. याप्रसंगी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रुर शिंदे, वसंत बालवक्ते अनन्या पवार, प्रथमेश झिंजाडे यांची भाषणे झाली.
आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सुदर्शन शहा यांनी कार्यक्रम सोहळा पाहून उत्स्फूर्तपणे सुदर्शन ग्रुप तर्फे शाळेसाठी १ लाख रूपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य देण्याचे अभिवचन दिले.

या कार्यक्रमाचे आयोजनासाठी अमृत करे-पाटील, जयंत करे-पाटील, जयेश पवार, कुणाल मिसाळ,माधुरी पवार,संकेत भोसले,केतन परदेशी,सुनिता येलारे आदिंनी अथक परिश्रम घेतले.
सुरताल संगीत विद्यालयाच्या बालचमुने स्वागतगीत सादर केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गणेश करे-पाटील यांनी केले ,सूत्रसंचालन प्रा.विष्णु शिंदे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!