घरासमोर झाडे लावा, ग्रामपंचायत घरपट्टी माफ करून मोफत पीठ दळून देईल – सरपंच मौला मुलाणी

कंदर (संदीप कांबळे) : “आपल्या घरासमोर दोन झाडे लावा – ग्रामपंचायत तुमची घरपट्टी माफ करून वर्षभर मोफत पीठ दळून देईल” असा अभिनव उपक्रम कंदरचे सरपंच मौला मुलाणी यांनी जाहीर करत गावकऱ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीचे आवाहन केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ५ जून २०२५ रोजी कंदर गावात ‘प्लास्टिक निर्मूलन’ या संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम पार पडला.

यावेळी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ यात्रेच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. तानाजी वळकुंडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. डॉ. स्वाती कदम यांनी ऊस लागवड व पाचट व्यवस्थापन या विषयावर तर, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, सोलापूर येथील शास्त्रज्ञ सौ. पिंकी रायगड यांनी डाळिंब व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विशाल वैरागर यांनी अभियानाची रूपरेषा शेतकऱ्यांना समजावून सांगितली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री मौला मुलाणी सरपंच व श्री उदयसिंह शिंदे उपसरपंच यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदर येथे आंब्याचे वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे ग्रामपंचायत सदस्य आरकिले माजी सदस्य दिलदार मुलानी, राजाभाऊ महाडिक, सहाय्यक कृषी अधिकारी, श्री. अजयकुमार बागल, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा), श्री. काशीनाथ राऊत, मंडळ कृषी अधिकारी केम, श्री. राजेंद्र खाडे, उप कृषी अधिकारी केम तसेच कृषी विज्ञान केंद्राचे सर्व कर्मचारी व कंदर येथील शेतकरी उपस्थित होते.


