‘ऊस बिला’साठी करमाळा तहसीलवर शेतकऱ्यांसाठी २१ जुलै ला ‘आक्रोश मोर्चा’ – राजाभाऊ कदम

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘ऊस बिला’साठी करमाळा तहसीलवर शेतकऱ्यांसाठी २१ जुलै ला ‘आक्रोश मोर्चा’ काढणार असल्याचे बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी सांगितले आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार विजयकुमार जाधव यांना देण्यात आले याप्रसंगी राजाभाऊ कदम म्हणाले कि, मकाई सहकारी साखर कारखान्याने नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना पहिलाच हप्ता दिला नाही, मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांना शेतकऱ्यांबाबत कसल्याही प्रकारची काळजी किंवा आत्मीयता दिसून येत नाही, जर शेतकऱ्यांची चिंता दिग्विजय बागल यांना असती तर आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम थोड्या प्रमाणात का होईना दिली असती, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली १० एप्रिल ला कुंभेज फाटा येथे रास्ता ‘रोको आंदोलन’ केले होते, तरीसुद्धा उसाची बिले मिळाली नव्हती, म्हणून चेअरमनच्या घरावरती शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार होता, तेव्हा मोर्चाच्या धास्तीने मकाईचे चेअरमन यांनी मकाई चे कार्यकारी संचालक खाटमोडे यांच्यामार्फत ‘मे’ अखेरपर्यंत बिले देतो असे लेखी पत्र दिले होते, परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळालेली नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांना प्रपंच चालवणं कठीण झाले आहे, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी सुद्धा मकाई कारखाना शेतकऱ्यांच्या उसाची बिले देत नाही.
त्याचप्रमाणे पुढे बोलताना श्री.कदम यांनी म्हटले कि, कमलाई साखर कारखान्याने डिसेंबर महिन्यापर्यंत पंधराशे रुपये दिले आहेत राहिलेली बिले शेतकऱ्यांची अद्याप पर्यंत दिलेली नाहीत त्यामुळे कमलाई कारखान्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड चिड आहे कमलाई कारखाना आमदार बबनदादा शिंदे यांच्या मालकीचा आहे विठ्ठलराव शिंदे माढा कारखान्याची बिले 2,800 रुपयांनी शेतकऱ्यांना दिली मग कमलाईची बिले का थांबवली दोन्ही कारखाने बबनदादा शिंदे यांच्या मालकीचे आहेत.
त्यामुळे आमदार शिंदे यांच्या वरती करमाळा तालुक्यातील जनता प्रचंड नाराज आहे म्हणून मकाई आणि कमलाई कारखान्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा दिनांक 21 सात 2023 रोजी करमाळा तहसील कचेरी वरती निघणार आहे तेव्हा मकाई सहकारी साखर कारखाना व कमलाई साखर कारखाना यांनी ताबडतोब शेतकऱ्यांची ऊस बिले काढावीत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
याप्रसंगी लालासाहेब काळे , सुंदरदास काळे, पांडुरंग रोडे, सागर मारकड, दिगंबर मारकड, रावसाहेब पाटील, लाला शिंदे, रोकडे मच्छिंद्र काळे आदी शेतकरी उपस्तित होते.


