लोकांच्या सोयीसाठी गरजेच्या ठिकाणी रेल्वे भूयारी मार्ग करावेत- रश्मी बागल

करमाळा (दि.८) – उमरड ते केडगाव, हजारवाडी ते जेऊरवाडी व पारेवाडी येथील पवार-गुंडगिरे वस्ती येथे रेल्वे लोकांची जाण्या-येण्याची सोय व्हावी यासाठी भूयारी मार्ग करण्याची मागणी रश्मी बागल यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
उमरड ते केडगाव,हजारवाडी ते जेऊरवाडी, पारेवाडी येथील पवार गुंडगिरे वस्ती याठिकाणी नागरीकांना लोहमार्ग ओलांडून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो त्यामुळे या ठीकाणी रेल्वे विभागाने भूयारी मार्ग करावा अशी मागणी साखर संघाच्या संचालिका भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी सहाय्यक मंडळ अभियंता कुर्डूवाडी तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात बागल यांनी म्हटले आहे की
उमरड केडगाव दरम्यान कि.मी.क्र.331/1 ते 2, पारेवाडी येथील पवार-गुंडगिरे वस्ती नजीक कि.मी.क्र.319/1 ते 2. आणि हजारवाडी ते जेऊरवाडी दरम्यान किमी.क्र. 338/4ते 5 याठीकाणी दूचाकी,चार चाकी तसेच पायी जाण्यासाठी येथील नागरीक, विद्यार्थी, ग्रामस्थ, आबालवृद्धांना गावात येण्यासाठी तसेच उजनी जलाशयावर जाण्यासाठी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडून प्रवास करावा लागतो. परंतू सध्या या ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणावरुन रेल्वे विभागाकडून तारेचे कुंपन घालून पाऊल वाट ही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांना रस्त्या अभावी त्रास सहन करावा लागत आहे. वरील नमुद केलेल्या ठिकाणी दुचाकी,चार चाकी व पायी जाण्यासाठी तसेच ऊमरड ते केडगाव दरम्यान चार चाकी,दुचाकी सह जड ऊस वाहतूक करण्यासाठी भूयारी (RUB) मार्ग करावा. समस्येची दखल घेत संबंधित गावातील ग्रामस्थांची होणारी अडचण दूर करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. सदर निवेदनाची प्रत रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना पाठविण्यात आली आहे.





