सव्वा लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी बँकेसमोरून केली लंपास

करमाळा : अंजनडोह (ता. करमाळा) येथील शेतकरी दिपक सुभाष शेळके (वय 32) यांची तब्बल सव्वा लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी बँकेसमोरून लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी त्यांनी करमाळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक शेळके हे शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय करतात. दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी करमाळा येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेतून एक लाख पंचवीस हजार रुपयांची रोकड काढली. ही रक्कम काळ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवून त्यांनी आपल्या पिकअप वाहनातील ड्रायव्हरच्या सीट मागे ठेवली.

यावेळी गाडी चालू केल्यावर मागील चाकात हवा कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हवा तपासून परत गाडीकडे येईपर्यंत ठेवलेली पैशांची बॅग गायब झाल्याचे त्यांना दिसले. परिसरात शोध घेतला मात्र बॅग मिळाली नाही. घटनेनंतर त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

