करमाळा तालुक्यातील चार पैकी तीन साखर कारखाने बंद – सव्वा अकरा लाख मे.टन ऊसाचे गाळप – सभासद ऊस बिलाच्या प्रतीक्षेत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तालुक्यातील चार पैकी तीन साखर कारखाने बंद झाले असून कमलाई साखर कारखाना अद्याप सुरू आहे. आत्तापर्यंत या चार कारखान्यातून साडेअकरा लाख मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. असे असलेतरी आदिनाथ वगळता तीनही कारखान्याने गेल्या तीन महिन्यापासून ऊस उत्पादकांच्या ऊसाची रक्कम दिली नसल्याने ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. सभासद वारंवार पैशाची गणी करत आहेत. परंतू कारखानदार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
गेल्या तीन वर्षानंतर प्रथमच यावर्षी तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे चारही साखर कारखाने सुरू झाले. उशीरा का होईना आदिनाथ सुरू झाला आणि २२ फेब्रुवारी २०२३ ला सांगता समारंभ झाला. आदिनाथने यावर्षी ७६ हजार ८८५ मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. एवढेच नाहीतर या गाळप केलेल्या ऊसाचे पेमेंटही त्यांनी चेकद्वारे सभासदांना दिले आहे.
भैरवनाथ शुगर ने यावर्षी ११२ दिवस गाळप करून ३ लाख ५५ हजार ५०० मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यातून ३ लाख १४ हजार ५०० साखर पोती उत्पादीत करून ८.९४ टक्के साखर उतारा मिळवला आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याने १०२ दिवस गाळप करून १ लाख ५९ हजार ३३५ मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. यातून १ लाख २१ हजार ८०० साखर पोती उत्पादीत झाली आहेत. साखर उतारा ७.७१ टक्के असा मिळाला आहे. साखर उतारा कमी असलातरी या कारखान्यातून मोलॅसिस मार्फत आसवनी प्रकल्प चालविण्यात आलेला आहे. त्याचा फायदा कारखान्याला होणार आहे. कमलाई साखर कारखाना अद्यापही सुरू असून ५ मार्च पर्यंत कारखाना चालू राहणार असल्याचे प्रशासनाकडून समजते. आत्तापर्यंत या कारखान्याने १०६ दिवसात ५ लाख ४८ हजार ०८१ मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून ४ लाख ८६ हजार ६५० साखर पोती उत्पादीत करण्यात आली आहेत.
करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या गाळपापेक्षाही बाहेरील साखर कारखान्यांनी जास्त ऊस गाळपासाठी नेलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविण्याची गरज असून अन्य साखर कारखान्यापेक्षा जादा दर देण्याची भुमिका बजवावी लागणार आहे. किंबहूना या कारखान्याने आपल्या कारभारात सुधारणा केली नाहीतर आणखीन जादा क्षमतेचा बाहेरील साखर कारखाना या तालुक्यात उभा राहू शकतो; याचेही भान तालुक्यातील साखर कारखान्यांना ठेवावे लागणार आहे.
कमलाई, मकाई व भैरवनाथ या कारखान्यांकडून अद्यापही ऊस उत्पादकांची बीले पूर्णपणे दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. ऊस बिले न मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. कारखान्याने ऊस उत्पादकांची बीले तात्काळ द्यावीत अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.