तालुक्यातील सर्वाधिक अनुभवी राजकारणी म्हणून विधानसभेला सर्वांनी मलाच का पाठिंबा देऊ नये?

करमाळा (दि.१३) – लोक मला विचारतात की यंदाच्या विधानसभेसाठी तुम्ही कोणाला पाठिंबा देणार? संजय मामा, नारायण आबा, बागलांना की झोळ सरांना? त्यावर लोकांना माझे असे उत्तर आहे की, तालुक्यातील सर्वाधिक अनुभवी व ज्येष्ठ मीच असून माझ्याच पाठीशी आजी -माजी आमदारांसह सर्व इच्छुक उमेदवारांनी उभे राहावे असे खुले आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आवाटी येथे केले.
करमाळा तालुक्यातील संगोबा व आवाटी विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा काल (दि.१२) आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभ हस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी आवाटी येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार जगताप बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जगताप घराण्यानेच करमाळा तालुक्याचा महत्वाचा पाणी अन् वीजेचा प्रश्न सोडवला. दुष्काळी सोलापूर जिल्हयातील ‘करमाळा अन् पाण्यावाचून तरमळा ‘ अशी ओळख असलेल्या करमाळा तालुक्यातील बाहेर तालुक्यातील लोक मुली द्यायला धजावत नव्हते अशा पाण्याची टंचाई असलेल्या करमाळ्यात कै. नामदेवराव जगताप साहेबांनी १९५२ साली आमदार असताना मांगी तलाव मंजूर करून घेवून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भूमिपूजन केले. तसेच १९६४ साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आग्रह करून उजनी धरणाची पायाभरणी केली . तत्कालिन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी सीनेवर धरण उभा करून मराठवाड्यातील निलंग्याला पाणी नेण्यासाठी सोयीस्कर अशी पोटेगावची साईट निश्चीत केली होती त्यामुळे जामखेड येथील बैल बाजारापर्यंत पाणी जात होते पण त्यावेळी मी स्वतः शिष्टमंडळासह, मंत्री सुशिलकुमार शिंदे तदनंतरचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले ,शरद पवार साहेब आदींना आग्रह करून कोळगाव -आवाटी जवळ ही साईट फायनल करण्यास भाग पाडले व हा ‘सिना – कोळगाव प्रकल्प ‘ मंजूर करून घेतला .
सीना कोळगाव धरणाचे भूमिपूजन व लोकार्पण हे माझे दोन्हीही माझ्याच आमदारकीच्या टर्ममध्ये झाले. मी अपक्ष आमदार होतो त्यामुळे माझाही शासनात दबदबा होता .माझे पवार साहेब, सुशिलकुमार शिंदे,अजितदादा, पद्मसिंह पाटील आदीं बरोबर खूप जवळीकता होती म्हणून करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सर्वात मोठे २२० केव्ही सबस्टेशन हे मी खास बाब म्हणून राजकिय ताकद वापरून मंजूर करून घेतले. कुकडीचे नियमित आवर्तणे अन् दहिगाव उपसासिंचन योजना, करमाळा शहर पाणीपुरवठा योजना’ इ . योजना केल्यामुळे तालुक्याचा पाणी अन् वीजेचा प्रश्न कायमचा मिटला. तालुक्यात विविध ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या.

रीटेवाडी उपसा सिंचन योजनेवर बोलताना ते म्हणाले यावर बोलण्याआधी रामवाडी येथून हजारो कोटी रु .ची ५ टी . एम .सी पाणी क्षमता असलेली ‘आष्टी उपसासिंचन योजना ‘कोणताही गाजावाजा न होता मंजूर पण झाली अन् राशीन पर्यंत त्याची चारी पण झाली आहे आपल्या हक्काच्या तालुक्यातील लोकांसाठी कोणीही याबाबत बोलले नाही . आता उजनी चे ओव्हरफ्लोचे पाणी करमाळा तालुका ओलांडून पर तालुक्यात जाणार आहे .रिटेवाडी उपसा सिंचन योजनेवर बोलणाऱ्यांनी कारखान्याचं वाटोळं केलं आता दूसरा मुद्दाच त्यांच्याकडे जनते समोर जाण्यासाठी नाही म्हणून ते सध्या या योजनेवर बोलत आहेत . सर्व विकास कामे लोकप्रतीनिधी या नात्याने कर्तव्य समजून केली . त्यामुळे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला हे वास्तव असल्याचे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांच्या गरजा आता वाढल्या आहेत , त्यामुळे सर्वांच्या मागण्या पूर्ण करणं शक्य नाही परंतू लोकप्रतिनिधींनी विकासात्मक कामे जबाबदारीने व कर्तव्य समजून केली पाहिजेत. नुसताच कोट्यावधी रुपयांचा निधी आणला म्हणून मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुज्ञ जनता लवकर ओळखते म्हणून लोकप्रतिनिंधींनी जनतेला भूलथापा मारून वेडयात काढू नये प्रत्यक्ष विकास कामांवर भर द्यावा. विधानसभा निवडणुकीच्या पाशर्वभूमीवर भाष्य करताना ते म्हणाले की मी पेरणीसाठी सावड केल्या सारखी दोघा -तिघांना मदत करून आमदार केले . मग मी पण जेष्ठ अन् अनुभवी आहे मग त्यांनी मला पेरणीतल्या सावडीच्या परतेफेडी सारखं आमदार होण्यासाठी मदत करावी . मला दोन -तीन पक्षा तून पक्षश्रेष्ठींनी विधानसभा उमेदवारीबाबत निमंत्रित केले आहे त्यावर तालुक्यातील सर्वांशी विचार विनीमय करून योग्य तो निर्णय योग्यवेळी घेवू असे ते म्हणाले . समोर बसलेल्या उपस्थितांनाही त्यांनी विकासकामे प्रत्यक्षपणे करणारा ,योग्य , जो हक्काने काम करु शकेल त्यालाच विधानसभेत पाठवावे असे आवाहन केले . आवाटी गावच्या ग्रामस्थांची अन् आमची तीन पिढयांची नाळ जोडलेली आहे मोठ्या साहेबांपासून माझ्या राजकिय कारकिर्दीतही आवाटी करांनी कायम आशिर्वाद दिले आहेत असा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू खान यांनी केले.
Related News – संगोबा व आवाटी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न


Jaywantrao Jagtap | former MLA karmala taluka district solapur | Speech | Sanjamama Shinde | Awati | Karmala