जेऊर येथे दोन गटात हाणामारी – दोन फिर्यादीत १६ जणांवर गुन्हा दाखल

करमाळा : जेऊर (ता. करमाळा) येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटात लोखंडी गज, लोखंडी फायटर, लोखंडी कोयता व लोखंडी कुऱ्हाड याने मारामारी होऊन त्यात जवळपास आठ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटाने एकमेकांविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. यात दोन फिर्यादीत १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी पहिली फिर्याद अर्जुन हनुमंत माने (रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की २६ मे ला सकाळी सात वाजता मी जेऊर येथील आठवडा बाजार असल्याने बाजार तळावर माझे भाजीपाल्याचे दुकान लावत असताना तेथे शंकर विष्णू माने, विकास बिभिषण माने, उमेश बिभिषण माने, नितीन विलास माने, विठ्ठल गोरख जाधव, आकाश ज्ञानेश्वर माने, अनिल विष्णू माने, बिभीषण जयवंत माने असे सर्वमिळून आले व त्यांनी तु येथे दुकान लावायचे नाही असे म्हणून शिवी व दमदाटी करून त्यांच्या हातातील लोखंडी गज, लोखंडी फायटर व ऊस तोडणीचा कोयता घेऊन आले होते. त्यावेळी मी व माझा चुलतभाऊ रणजित माने व ऋतिक माने, सोमनाथ माने, लखन माने, शिवाजी माने हे भांडण सोडवत असताना या सर्वांनी मिळून आम्हां सर्वांना त्यांच्या हातातील हत्याराने मारून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी दुसरी फिर्याद विठ्ठल गोरख जाधव यांनी दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की घरजागेच्या वादातून ऋतिक बाळू माने, लखन संतोष माने, सोमनाथ गोरख माने, अंकुश सुर्यभान माने, शिवाजी संतोष माने, रणजित बाळू माने, अर्जुन हनुमंत माने, सुर्यभान हरिबा माने (सर्व रा. जेऊर) यांनी लोखंडी गज, लोखंडी फायटर, कु-हाडीने मारहाण करून जखमी केले आहे.या प्रकरणी पोलीसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




