ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांना शिस्त कधी लागणार?

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : बेशिस्त ट्रॅक्टर चालकांमुळे आजपर्यंत अनेक बळी गेले असून देखील दरवर्षी साखर कारखाने सुरू झाले की अनेक ट्रॅक्टर चालकांचा रस्त्यावर बेशिस्त पणाने वागण्याचा प्रकार पुन्हा पुन्हा चालूच असतो. पोलीस प्रशासनाने अशा बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवर वेळीच कारवाई केली तर वेळीच अपघात टाळले जाऊ शकतील.

बेशिस्त वागण्यातील एक प्रकारे म्हणजे चढावरती ट्रॅक्टर चढविण्यासाठी वापरलेले दगड काम झाल्यावर न काढता रस्त्याच्या मधोमध तसेच ठेवणे. करमाळा शहराकडून पुण्याला जाताना रोशेवाडीच्या पुढे मोठा चढ लागतो. ऊस भरून निघालेले ट्रॅक्टर सहजासहजी तो चढ पार करू शकत नसल्यामुळे ट्रॅक्टर चालक हे उसाच्या ट्रॉलीला मोठमोठ्या दगडाच्या उटी लावून ट्रॅक्टर पुढे घेतात. परंतु ट्रॅक्टर जेव्हा पुढे जातो त्यावेळेस त्या रस्त्यावर पडलेले दगड आहेत तशीच ते तिथे टाकून निघून जातात. एक साईडने तीव्र उतार व एक साईडने पूर्ण चढ असल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड असतो अपवाद मोठी वाहने वगळता लहान कारचालक असतील किंवा दुचाकी स्वार असतील या रस्त्यावर पडलेल्या दगडांमुळे मोठे अपघात होऊन जीवित हानी होते.आज पर्यंत करमाळा तालुक्यात बेशिस्त ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांमुळे अनेकांचे बळी गेलेले असून कित्येक जण जखमी झालेले आहेत. तर कित्येक जणांना कायमचं अपंगत्व आलेले आहे.

मी सकाळी माझ्या खाजगी वाहनाने कुटुंबातील सदस्यांना घेऊन पुण्याला निघालो होतो . करमाळ्यावरून पुण्याकडे निघालो असताना रोशेवाडीच्या चढावरती प्रचंड प्रमाणात दगड पडलेले होते. अचानक समोर दगड दिसल्यामुळे मी माझी गाडी कंट्रोल केली. परंतु त्यातील दगड माझ्या टायर खाली येऊन माझ्या गाडीच्या इंजिनला वेगात धडकला त्यामुळे इंजिनच्या वरील आवरण अक्षरशा तुटून पडले मी वेळीच गाडी कंट्रोल केल्यामुळे पुढील धोका टळला.

-श्री कुंभार, करमाळा

बेशिस्त वागण्यातील दुसरा प्रकारे म्हणजे ट्रॅक्टर चालक हे ट्रॅक्टर चालवताना कर्णकर्कश आवाजात गाणे लावतात. व प्रचंड वेगाने चालवतात ज्यामुळे त्यांना पाठीमागून आलेल्या गाड्या समजत नाहीत व गाड्यांचे हॉर्न ऐकू येत नाही. कर्णकर्कश आवाजामुळे गावातील लोकांना अनावश्यक ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो.

या संदर्भात काही ट्रॅक्टर चालकांच्या निष्काळजीपणाचा अजून एक प्रकार म्हणजे काही ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॉलीला पाठीमागे रेडिअम, अथवा लाईट रिफ्लेक्टर लावत नाहीत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली न दिसल्यामुळे अनेकजण अशा ट्रॉलीला जाऊन धडकून अपघात होतो.

अशा नियम न पाळणाऱ्या बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवरती पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई करावी व होणारे अपघात टाळावे.

ट्रॅक्टर चालकांनी चढावर लावलेल्या उटी (दगड) काम झाल्यावर काढून घेतले पाहिजेत तसेच ट्रॅक्टर चालकांनी ट्रॉलीला पाठीमागे ठळकपणे दिसणारे रेडिअम, अथवा लाईट रिफ्लेक्टर बसवून घेतले पाहिजे. आपल्या एका चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा जीव जावू शकतो किंवा जन्मभरासाठी अधू होऊ शकते, त्यामुळे याची खबरदारी ट्रॅक्टर चालकांनी घ्यावी.

प्रवीण अवचर, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!