तहसीलदार जाधव यांच्या आश्वासनानंतर युवासेनेने उपोषण घेतले मागे - Saptahik Sandesh

तहसीलदार जाधव यांच्या आश्वासनानंतर युवासेनेने उपोषण घेतले मागे

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील युवासेनेकडून शेतकऱ्यांसंबंधीच्या मागण्यांसाठी १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरु केले होते. अखेर १६ ऑगस्ट रोजी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी आंदोलन कर्त्यांना दिलेल्या आश्वासनानंतर युवासेनेने हे उपोषण मागे घेतले.

उसबील, अतिवृष्टी अनुदान, करमाळा कोर्टी,केतुर मंडलातील शेतकऱ्यांचा सततच्या पावसात समावेश करून नुकसान भरपाई द्यावी, पि एम किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची हेळसांड थांबवा इत्यादी मागण्यासाठी युवासेना विस्तारक उत्तम आयवळे शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.

या आंदोलनाविषयी अधिक माहिती देताना श्री.फरतडे म्हणाले की, विद्यमान लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख विरोधी नेते व कारखानदारांकडून शेतकऱ्यांची चेष्ठा सुरु असुन प्रशासक सत्ताधाऱ्यांच्या दबावत असल्याचा आरोप केला होता. तसेच साखर आयुक्तचा नियम मोडून पंधरा दिवसांत पहिला हप्ता न देणाऱ्या कारखान्यावर गुन्हा दाखल करून जप्ती करण्याची मागणी लावून धरली होती. सरकार गतीमान असल्याचा आव आणत आहे. मात्र एक वर्षापासून शेतकरी उसबील व अतिवृष्टी अनुदानाची वाट पाहत असल्याने हे फक्त नावालाच गतीमान सरकार असल्याची टिका देखील फरतडे यांनी केली.

पत्रकार बांधवानी व विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा देऊन प्रसिद्धी दिल्यानंतर तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी समक्ष येवून मध्यस्थी करुन लेखी आश्वासन दिले. तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी आंदोलन कर्त्यांना आश्वस्त करताना सांगीतले की कमलाई शुगर ची साखर जप्त करून विक्री सुरु असुन आजपासूनच पंधराशे रुपयांप्रमाणे पेमेंट सुटणार आहे. मकाई साखर कारखान्यावर जप्ती किंवा बोजा चढवण्याबाबत प्रकिया सुरु असुन दोन दिवसात मकाई वर कायदेशीर कारवाई करू तसेच करमाळा कोर्टी केतुर मंडलातील शेतकऱ्यांना सतत च्या पावसात समावेश करण्यासाठी योग्य तो प्रस्ताव पाठवला असुन १६ कोटी रूपये नुकसानभरपाई मागितली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. काही शेतकऱ्यांचे बॅंक तपशील आधार चुकीचे असल्याने दुरुस्त करून पाठवले आहे. ज्यांचे सर्व तपशील बरोबर आहे अशांना टप्यात टप्यात शासनाकडून पैसे थेट खात्यावर जमा होत आहेत , पि एम किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांकडून कृषी, तलाटी व ग्रामसेवक यांच्या मार्फत केवायसी करून घेत आहोत मात्र लॅण्ड सिडींग नो.(भुमीअभिलेख अद्ययावत नसणे) या त्रुटी साठी २२ ऑगस्ट पासुन विशेष कॅम्प आयोजित केला जाईल .

तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित करत आहेत मात्र दिलेली आश्वासने पाळली नाहीत तर अत्मदहन आंदोलन करू असा इशारा युवासेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला .

या वेळेस शिवसेना तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, मा उपसरपंच शिवसेना शाखा प्रमुख उत्तम हनपुडे सर ,माजी उपसरपंच जोतीराम घाडगे, तालुका सरचिटणीस उपसरपंच पांडुरंग ढाणे, युवासेना उपप्रमुख अभिषेक मोरे, शाखा प्रमुख ओकांर कोठारे ,उपशाखा प्रमुख मयुर तावरे, पप्पू निकाम , सुरज पुजारी आदी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल घुमरे दिपक शिंदे, आरपीयचे अर्जूनराव गाडे ,यशपाल कांबळे, माजी नगरसेवक फारूक जमादार भिमदलचे सुनिल भोसले, शहाजी धेंडे, आदींनी आंदोलनास पाठींबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!