करमाळा शहरातील विविध समस्यांबाबत भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक – अधिकाऱ्यांना घातला घेराव

करमाळा (दि.१४): करमाळा शहरातील विविध समस्यांवर नगरपालिकेकडून सतत होणाऱ्या दुर्लक्षितपणामुळे वैतागून भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.१३) आक्रमक पवित्र घेतला. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांची सरबत्ती करून शेवटी याबाबत सविस्तर निवेदन दिले. त्याचबरोबर विविध घोषणा देऊन त्यांनी परिसर दणाणून सोडला.

सुरुवातीला या सर्व कार्यकर्त्यांना नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना भेटून तक्रारीचा पाढा वाचायचा होता परंतु मुख्याधिकारी जागेवर नसल्याने त्यांनी आपला मोर्चा कार्यालयीन अधीक्षक कवीटकर यांच्याकडे वळविला. यावेळी स्वच्छता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील विविध समस्यांचा पाढाच वाचून दाखविला.
- यामध्ये करमाळा शहरामध्ये पाणी टंचाई, खराब रस्ते,
- अस्थाव्यस्थ पडलेले कचराचे ढीग, मोकाट जनावरांचा त्रास,
- अनेक कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकजन गंभीर जखमी झाले आहेत.
- धुळीच्या त्रासाने अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.
- घंटागाडी नियमित येत नाही.
- गटारी तुंबल्याने रोगराई पसरत आहे. सुखसुविधा देत नसतानाही वारेमाप घरपट्टी वाढ,
- नगरपालिकेत अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत भेटत नाहीत.
- टाऊनहॉल परिसराची अस्वच्छता,
- जयप्रकाश नारायण यांच्या पुतळा परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य
- हालचाल रजिस्टर पूर्ण नसणे आदि विषयावर नाराजी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, सिनेट सदस्य दिपक चव्हाण, मा.शहर अध्यक्ष संजय घोरपडे, महिला शहर अध्यक्ष रेणूका राऊत,सरचिटणीस जितेश कटारिया, नरेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, मनोज कुलकर्णी, प्रदिप देवी, पत्रकार सिध्दार्थ वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा शशिकांत पवार यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नगरपालिकांना पत्र दिले त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी संजय घोरपडे यांनी केली. तर दिपक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून माहिती दिली.यावेळी मुख्याधिकारी यांना योग्य सुचना देऊत असे विना पवार यांनी सांगितले.




