देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे सदस्यपद कायम..

करमाळा(दि.१३) : देवळाली (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे सदस्यपद पुणे येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी पुन्हा कायम केले असून, उपजिल्हाधिकाऱ्यांनी रद्दबातल ठरवलेले सदस्यपद पुन्हा सक्रिय केले आहे. श्री.गायकवाड यांच्यावर शासकीय इमारतीवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

देवळाली ग्रामपंचायतीची मुदत २०२१ ते २०२५ अशी असुन, आशिष कल्याणराव गायकवाड यांनी यापूर्वी सरपंचपद भूषवले होते. देवळाली येथील सुधीर विलास आवटे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे गायकवाड परिवाराने शासकीय अंगणवाडी इमारतीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून शासकीय स्वस्त धान्य दुकान थाटले असल्याची लेखी तक्रार केली होती तसेच श्री गायकवाड यांना पदावरून बडतर्फ करावे अशी देखील मागणी त्यांनी केली होती. श्री.आवटे यांच्या तक्रारीनंतर ग्रामसेवक व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी गावातील पंचांच्या उपस्थितीत या अतिक्रमीत जागेची पाहणी करुन अहवाल सादर केला. या अहवालावरून अतिक्रमण केल्याचे समोर आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी सरपंच व विद्यमान सदस्य आशिष गायकवाड यांना पुरावे देण्याबाबत व म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली. मात्र पुरावे सादर न झाल्याने त्यांचे सदस्यपद रद्द ठरविण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-3) व 16 प्रमाणे उत्तरवादीनां ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरवुन त्यांची निवड रद्द केली. १० डिसेंबर २०२४ रोजी हा निर्णय दिलेला होता.
त्यानंतर श्री.गायकवाड यांनी तातडीने पुणे येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त यांचेकडे अपील दाखल केले, यात आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द करत आशिष गायकवाड यांचे सदस्यपद कायम केले आहे.





