
एखाद्या शाळेचा कायापालट केवळ इमारतीच्या भिंती रंगवून किंवा नवीन सुविधा उभारून होत नाही. त्यासाठी दूरदृष्टी, सातत्य, नियोजन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची तळमळ असावी लागते. याच विचारातून काम करणाऱ्या नागशेन कैलास पोळके यांनी पुरंदर तालुक्यातील वीर येथील रवींद्रनाथ टागोर विद्यालयात शैक्षणिक परिवर्तनाची नवी वाट निर्माण केली आहे.
आज शाळेच्या परिसरात प्रवेश करताच स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेले वातावरण दिसते. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहे, पाण्याची सुविधा, रात्र अभ्यासिका आणि विविध शैक्षणिक उपक्रम यामुळे विद्यालयाने अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नागशेन पोळके यांनी ११ ऑगस्ट २०२३ रोजी रवींद्रनाथ टागोर विद्यालय, वीर येथे मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी शाळेतील विद्यार्थी संख्या सुमारे २२५ होती. परिसराच्या स्वच्छतेपासून ते भौतिक सुविधांपर्यंत अनेक बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज होती.
ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार पोळके यांनी केला. शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांना सोबत घेत त्यांनी शाळेच्या विकासाचा आराखडा तयार केला. त्याचा परिणाम आज स्पष्टपणे दिसून येतो. पाचवी ते दहावीतील विद्यार्थी संख्या आता ३०४ झाली आहे.
शाळेच्या परिसरात फुलली ज्ञानासोबत हिरवाई
शाळेचा परिसर स्वच्छ करण्याबरोबरच त्याचे सुशोभीकरण करण्यात आले. परिसरात ८५ चिंचेची झाडे, ३५ पेरूची झाडे आणि जवळपास ५०० फुलझाडे लावण्यात आली. शाळेला प्रवेशद्वार तयार करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळेत येताना केवळ शिक्षणाचे नव्हे, तर निसर्गाचेही संस्कार मिळावेत, हा त्यामागील दृष्टिकोन आहे.
वर्गखोली झाली आधुनिक
आजच्या डिजिटल युगातील शिक्षणपद्धतीचा स्वीकार करत विद्यालयातील वर्गखोल्यांमध्ये व्हाइट बोर्ड, प्रोजेक्टर आणि स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हॉलची दुरुस्ती करण्यात आली असून २० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुमारे २५ लाख रुपये खर्चाची अत्याधुनिक मुला-मुलींची स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे शाळेतील पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडली आहे.

गुणवत्तेचे शिक्षण आणि वाढता निकाल
भौतिक सुविधांबरोबरच शिक्षणाच्या गुणवत्तेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. त्याचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या कामगिरीत दिसू लागले आहे. दहावीचा निकाल ९७ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे पोळके सांगतात.
शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला परीक्षा आणि विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रातही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुस्ती आणि विविध खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुरू करण्यात आलेली रात्र अभ्यासिका हा उपक्रमही विशेष उल्लेखनीय ठरतो आहे.
१९७१ पासूनच्या माजी विद्यार्थ्यांना जोडले
शाळेच्या विकासासाठी केवळ शासन किंवा संस्थेवर अवलंबून न राहता शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. १९७१ पासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला.
या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना शाळेशी पुन्हा जोडण्यात आले. पोळके यांच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत माजी विद्यार्थ्यांकडून शक्य होईल त्या स्वरूपात सुमारे ७५ ते ८० लाख रुपयांच्या वस्तूरूप देणग्या मिळाल्या. त्यातून शाळेच्या विविध सुविधा आणि उपक्रमांना बळ मिळाले.
ही बाब केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेसाठी पुन्हा काहीतरी करण्याची भावना माजी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली, हे या उपक्रमाचे मोठे यश म्हणावे लागेल.

मराठी माध्यमासाठी मार्गदर्शक उपक्रम
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी विद्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मराठी शाळांसाठी मार्गदर्शक हस्तपुस्तक तयार करण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे.
शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे पूर्ण करणे नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे होय. याच व्यापक दृष्टिकोनातून विद्यालयात विविध उपक्रम राबवले जात आहेत.
नागशेन पोळके यांचा प्रवासही या कार्यामागील सातत्याची जाणीव करून देतो. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण श्री उत्तरेश्वर हायस्कूल, केम येथे झाले. पुढील शिक्षण कुर्डूवाडी व बार्शी येथे झाले, तर बी.एड.चे शिक्षण बेळगाव येथे पूर्ण केले. फेब्रुवारी १९९६ मध्ये शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रवास सुरू झाला.
मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शाळेच्या विकासाला प्राधान्य दिले. मात्र हा बदल केवळ एका व्यक्तीचा नसून शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी यांच्या सहभागातून घडलेले सामूहिक परिवर्तन आहे.
“शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले म्हणून अनेक गोष्टी शक्य झाल्या.” असे नागशेन पोळके सांगतात.
आज रवींद्रनाथ टागोर विद्यालयाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—शाळेचा विकास हा केवळ इमारतींचा विकास नसतो; तो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रवास असतो.
पुरंदरच्या ऐतिहासिक वीरभूमीत या विद्यालयाने उभारलेला शैक्षणिक प्रवास त्यामुळे केवळ एका शाळेची यशोगाथा न राहता, ‘इच्छाशक्ती, नियोजन आणि समाजाचा सहभाग असेल तर शाळेचे चित्र बदलू शकते’, याचे उदाहरण ठरत आहे.
✍️ संजय जाधव, केम, ता. करमाळा, जि. सोलापूर
