पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करावी – तहसीलदारांना निवेदन

करमाळा (दि.२९) – मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनेतील जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष भारत अवताडे यांनी करमाळा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला, हे अत्यंत वेदनादायी आहे. केवळ आठ महिन्यात हा
पुतळा पडतो, हे अनाकलनीय आहे. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी करमाळा च्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत. सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा रहावा.
सदर निवेदनाची प्रत करमाळा पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे.





