लक्ष्मीपूजनाचा मान विधवा महिला भगिनींना द्यावा – प्रमोद झिंजाडे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सर्व बाबतीत पुढारलेल्या जगात आज देखील विधवा महिलांना विविध सणावाराला मानपान दिला जात नाही. विधवा महिला सन्मान कायदा राज्य शासनाकडून पारित होईल तेव्हा होईल परंतु समाजानेच स्वतः हुनच विविध विधवा प्रथा बंद करण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे येत्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा मान आपल्या विधवा भगिनींना देऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी द्यावी ही असे आवाहन ‘विधवा महिला सन्मान व संरक्षण हक्क कायदा’ अभियानाचे जनक व महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी प्रेसनोट द्वारे सर्वांना केले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आपण गेल्या दोन वर्षांपासून विधवा प्रथा निर्मूलन अभियान राबविण्यात यशस्वी झालोत. हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे परिपत्रक तसेच महाराष्ट्र व गोवा शासनाने कायदा करण्याबाबत अधिवेशनात शून्य प्रहारात प्रश्न उपस्थित करून चर्चा केली. आता देशात ठिक ठिकाणी या विषयावर अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था शासकीय पातळीवर काम करत आहेत. अनेक ठिकाणी पती निधना नंतर दोन्ही परिवाराकडून (सासर व माहेेर) विधवा प्रथा जसे की कुंंकू पुसणे,बांगड्या फोडणे, मंगळसूत्र तोडणे, पायातील जोडवी काढणे या प्रथा करण्याबाबत मनाई करतात. कायदा होईल तेव्हा होईल. पण प्रत्यक्षात समाजच पुढाकार घेऊन विधवा प्रथा बंद करण्याबाबत पुढाकार घेऊन बंद करतात. हे आपल्या सर्वांचे यश आहे. मात्र अजून त्यांना सणावाराला सन्मान मिळत नाही. त्यामुळे येत्या दिवाळीत लक्ष्मीपूजन पूजेचा मान आपल्या विधवा भगिनींना देऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी द्यावी.