आदिनाथ बंद पाडण्यासाठीच प्रशासक मंडळांनी नेमले सल्लागार मंडळ - सुभाष गुळवे - Saptahik Sandesh

आदिनाथ बंद पाडण्यासाठीच प्रशासक मंडळांनी नेमले सल्लागार मंडळ – सुभाष गुळवे


करमाळा (संदेश प्रतिनिधी) : श्री.आदिनाथ सह.साखर कारखाना बंद करण्याचा सल्ला देण्यासाठीच मंञी तानाजी सावंत यांच्या आदेशाने नेमलेल्या प्रशासक मंडळाने आदिनाथ वरती सल्लागार मंडळ नेमले होते काय ?असावा असा प्रश्न बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी उपस्थित केला आहे.

सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊस उपलब्ध होत नसल्यामुळे कारखान्याचे गाळप होत नाही. अशातच मागील आठवड्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती हरिदास डांगे, डॉ.वसंत पुंडे, धुळाभाऊ कोकरे ,सुहास गलांडे व अच्युत तळेकर यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. बुधवार ता.13 रोजी सल्लागार म्हणून नेमलेले हरिदास डांगे यांनी आदिनाथ कारखान्यावरती बैठक बोलावली होती. या आयोजित बैठकीत बोलताना हरिदास डांगे यांनी कारखान्याला ऊस मिळत नसल्याने कारखाना चालून जास्त तोट्यात जात आहे त्यामुळेआदिनाथ कारखाना बंद करून निवडणूक घ्यावी असा सल्ला दिला आहे. याविषयी बोलताना बारामती सुभाष गुळवे यांनी प्रशासकीय मंडळ व सल्लागार मंडळ यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. याबाबत पुढे बोलताना सुभाष गुळवे यांनी सांगितले की श्री आदिनाथ सह. साखर कारखाना बारामती ऍग्रो ला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाल्यानंतर हरिदास डांगे, डॉ.वसंत पुंडे, महेश चिवटे व इतरांनी एकत्र येत आदिनाथ बचाव समिती स्थापन केली आणि आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून आदिनाथ कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सोंग केले.

प्रत्यक्षात मात्र काय झाले हे आपण सर्वजण पाहत आहोत.आदिनाथ कारखान्यावरती मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या सोयीचे प्रशासक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांची नेमणूक करून हवे ते निर्णय करून घेण्याचा प्रकार सुरू केला आहे.
आजच्या सभेत बोलताना प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी ठरल्याप्रमाणे आदिनाथला मदत मिळाली नसल्याचे मान्य केले आहे. यावरूनच सर्व प्रकार लक्षात येतो.

कारखान्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसल्याने आणि कारखान्याला कोणीही ऊस देत नसल्याने कारखाना स्वतः प्रशासकांनी कसा बंद करायचा ? म्हणून सल्लागार मंडळ नेमून सल्लागार मंडळात नेमलेल्या हरिदास डांगे व इतर मंडळी मार्फत कारखाना बंद करायचा विषय पुढे आणला आहे.याचाच अर्थ प्रशासकीय मंडळाला कारखाना चालवता येत नाही म्हणून कारखाना बंद करण्याचे खापर दुसऱ्याच्या माती मारण्यासाठी प्रशासकीय मंडळांनी हे सल्लागार मंडळ नेमले आहे.

आजच्या झालेल्या बैठकीत बारामती ॲग्रोने १५ वर्षांवरून २५ वर्षासाठी आदिनाथ भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रयत्न केला असा आरोप केला आहे.मात्र असा आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा कारखाना हा देखील २५ वर्षासाठीच भाडे तत्त्वावर घेतला आहे .सावंत यांनी तेरणा कारखाना 25 वर्षासाठी भाडे तत्त्वावर कसा घेतला याचे उत्तर बारामती ॲग्रोवर टीका करणाऱ्यांनी आधी द्यावे.

सुभाष गुळवे, उपाध्यक्ष बारामती ॲग्रो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!