आमच्या पॅनलकडे कारखान्याच्या विकासाचा ठोस आराखडा तयार – आमदार पाटील

करमाळा(दि.१०): आमच्या पॅनलकडे कारखान्याच्या विकासाचा ठोस आराखडा आहे, तर विरोधक फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानात उतरले आहेत,” असा टोला आमदार नारायण आबा पाटील यांनी लगावला. शेटफळ येथे आयोजित ‘संजिवनी पॅनल’ च्या प्रचार सभेत ते बोलत होते. विरोधकांना लगावला.

आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत सध्या आजी-माजी आमदारांचे पॅनल एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरले आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी वयोवृद्ध शेतकरी दशरथ लबडे होते. यावेळी व्यासपीठावर मोहन पोळ, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, सरपंच विकास गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, “आमच्या पॅनलमधून कारखान्याच्या विकासासाठी निष्ठेने आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे तरुण कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सुसंगठित नियोजन आणि अभ्यासपूर्वक दृष्टिकोन ठेवून आम्ही ही निवडणूक लढत आहोत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी मी स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे.

सभा प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशनचे सचिव पांडूरंग वाघमारे यांनी मानले.या सभेला ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज मंदिर परिसरात मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला आमदार नारायण आबा पाटील यांनी शेटफळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


