कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो – आ.पाटील

करमाळा(दि.८): कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. राजकीय ताकद पणाला लावून आदिनाथ साखर कारखाना सुरु करुन दाखवणारच, अशी ग्वाही आमदार नारायण आबा पाटील यांनी उमरड येथील प्रचारसभेत दिली. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ‘संजिवनी पॅनल’च्या प्रचारार्थ उमरड येथे सभा पार पडली. सभेप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती.

या सभेच्या अध्यक्षस्थानी छगणराव वलटे होते. व्यासपीठावर माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, डॉ. प्रा. संजय चौधरी, सरपंच विकास गलांडे, तात्यासाहेब सरडे, दादासाहेब कोकरे, राहुल गोडगे, शशिकांत नरूटे, सर्जेरावनाना रिटे, गणेश चौधरी (माजी सरपंच) व इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, “तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिले, मी तुमच्या विश्वासास पात्र राहून काम केले आहे आणि करत राहीन. एकदा आदिनाथ कारखाना माझ्या ताब्यात द्या, मी हा कारखाना उर्जित अवस्थेत आणून दाखवेन. सभासदांच्या विश्वासावर हे सहकाराचे मंदिर टिकवायचे आहे.”

प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले, तर आभार उमेदवार श्रीमान चौधरी व राजाभाऊ कदम यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. बंडगर यांनी केले. दिवसभरात संगोबा, कुंभेज व पोफळज येथे सभेनंतर उमरड ही आदिनाथ संजिवनी पॅनलची चौथी सभा ठरली.




