आबा गेले… पण आठवणींचा वसा शिल्लक…

करमाळा : आज शब्द थांबलेत, डोळे भरून आलेत, आणि काळजाने एक दीर्घ उसासा घेतलाय. कारण नारायण भागुजी कुऱ्हाडे उर्फ ‘आबा’ यांचे (ता.20) रोजी निधन झाले… हे वाक्य उच्चारताना मन अनेक आठवणींनी गलबलून जातंय. कारण आबा म्हणजे फक्त कुऱ्हाडे परिवारातील एक वडीलधारी व्यक्ती नव्हते, तर ते एक संयमाचे प्रतीक, ज्ञानाचे दीपस्तंभ, आणि माणुसकीचा गाभा होते. त्यांच एक सामान्य आयुष्य, पण असामान्य जगणं होतं…
कष्ट, साधेपणा आणि शिस्तीच्या मार्गावर त्यांनी आपलं संपूर्ण जीवन घडवलं. शेतीची घडण, जनावरांची सेवा, आणि त्याचबरोबर घरात वाचनसंस्कृतीची पायाभरणी – हे सगळं ते इतक्या नैसर्गिक पद्धतीने करायचे की कोणालाही ते कधी कृत्रिम वाटलं नाही.त्यांच्या कामात शिस्त आणि सौंदर्य दोन्ही जाणवायचं, वाचन हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. एखाद्या माणसाच ‘वाचन करून मन मोठं होतं’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवावी, तर ती आबांनीच..आबा हे वडीलपणाचं खरं उदाहरण आहेत…
आबांनी आपली दोन मुले – राजेंद्र ( वस्तू व सेवा कर मध्ये राज्यकर सह आयुक्त ) आणि सुधीर (एक आदर्श शेतकरी) – यांना फक्त वाढवलं नाही, तर सुसंस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास यांची शिदोरी दिली. त्यांच्या दोन कन्या मीनाक्षी (सातपुते) व योगिता (पांढरे) या आपल्या कुटुंबात सुखी आहेत, ही त्यांच्या पालकत्वाची पुन्हा एक ग्वाही.नातवंडं डॉक्टर, इंजिनिअर होऊन पुढची पिढी समृद्ध बनली आहे.– हे पाहून त्यांच्या डोळ्यांतून अनेकदा समाधानाचे अश्रू वाहायचे.
आजारपणातही संयम, आणि शेवटपर्यंत उत्साह कायम होता.
गेल्या पाच वर्षांपासून आबा आजाराशी झुंज देत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही थकवा नव्हता. एकामागोमाग एक आजार येत होते. वहिनी (सखुबाई) यांनी अहोरात्र सेवा केली
ज्या व्यक्तीने आयुष्यभर “मी हरायचं नाही” ही वृत्ती जपली, तीच वृत्ती त्यांच्या आजारपणातही दिसून आली. 26 मे 2025 रोजी त्यांच्या लग्नाचा 58 वा वर्धापन दिवस अगदी आनंदात साजरा झाला. मुलं, नातवंडं, पाहुणे – सगळ्यांच्या उत्साहात ते खुद्द सहभागी होते.
प्रत्येक जण “अबा शताष्यु होणार म्हणत होते.” पण नियतीने ही भावना क्षणात हिरावून नेली…आता आबा या शरीररूपात नाहीत. पण त्यांनी दिलेल्या मूल्यांचं, विचारांचं आणि संस्कृतीचं बीज एवढं खोलवर रोवलेलं आहे की, त्यांच्या आठवणी आमच्या प्रत्येक कृतीत दिसतील. घरात पुस्तकांच्या कपाटाजवळ थांबताना त्यांची आठवण येईल. अंगणात जनावरांच्या पायात लावलेली गुंडाळी बघताना त्यांचा सहवास आठवेल.पण त्यांचा आवाज, आज नीरव शांततेत हरवून गेलाय… आबा गेले… पण त्यांनी उभं केलेलं कुटुंब, संस्कार, आणि मूल्यं – याचं देणं हे काळाच्या कसोटीतही जपलं जाईल.ते एक झाड होते – ज्यांनी सावली दिली, फळं दिली आणि शेवटी मुळं खोलवर रोवून आपलं अस्तित्व जगात ठेवून गेले…
“तुम्ही नव्हता एक व्यक्ती… तुम्ही होता एक विचार!”
आबांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
– ॲड.डॉ.बाबूराव हिरडे, करमाळा.






