रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी ३ फेब्रुवारीला मंत्रालयात बैठक

करमाळा(दि.२५): प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या प्रगती संदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे केली होती.याचीच दखल घेत येत्या ३फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना नेते मकाई सहकारी साखर कारखाना मा. चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली.

यावेळी बागल यांनी बोलताना सांगितले की करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजना ही प्रस्तावित असून त्या संदर्भात भाजप महीला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या मागणीनुसार शासनाने यापूर्वी सर्व्हे करण्याबाबत संबंधित विभागास आदेश दिलेले आहेत.परंतु आदेश होऊनही संबंधित सर्व्हेचे काम अद्याप सुरु झालेले नाही.सदर सिंचन योजनेमध्ये रिटेवाडी सह ४५ गावांचा समावेश आहे.याबाबत लोकभावना व सदर भागातील सिंचनासाठी असलेली पाण्याची गरज लक्षात घेता प्रकल्पाचे काम गतीने होणे आवश्यक आहे.

ही योजना गतीने राबवण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्यासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न करणार असल्याचे बागल यांनी बोलताना सांगितले.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाकडून बैठकीचा तपशील व कार्यक्रम जाहीर झालेला असून यात दिग्विजय बागल यांच्या निवेदनाचा संदर्भ या बैठकीला देण्यात आला आहे. या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदीजन उपस्थित राहणार आहेत.





