रानमाळावरती फुलवले नंदनवन!

करमाळा-अहमदनगर महामार्गावरून मांगीकडे जाताना टोल नाक्याजवळ अनेक ठिकाणी पडीक माळरान पाहायला मिळते. याच माळरानावर नुकतेच एक कृषी पर्यटन झाल्याने नंदनवन झाल्यासारखे भासत आहे. या कृषी पर्यटनाला नुकतेच भेट देण्याचा योग आला.
या ठिकाणी विविध फुल-फळ झाडांची लागवड करण्यात आली आहे. बांबूचा व इतर टाकाऊ वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करून कमी खर्चात या कृषी पर्यटनाची उभारणी करण्यात आलेली आहे. सध्या हुरड्याचा सीजन असल्यामुळे करमाळा तालुका वासियांसाठी प्रथमच हुरडा महोत्सवाचे येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
गुळ भेंडी सारखा दुर्मिळ आणि चविष्ट हुरडा येथे उपलब्ध आहे. त्याबरोबर विविध चटणी, फरसाण, फळे, उसाचा रस दिला जातो. थोडा ब्रेक घेऊन गावरान जेवण ज्यात पिठलं भाकरी, ठेचा, पापड लोणचे असे रुचकर जेवण दिले जाते. प्रशस्त अशा जागेमध्ये हे कृषी पर्यटन असून लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी मोठ्यांसाठी हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन सापशिडी, लुडो, तिरंदाजी आदी विविध खेळ ठेवले आहेत. पाठिमागे कानाला मधुर असे संगीत-धून सतत सुरु असते. सोबत गप्पा, गोष्टी, खेळ मनोरंजन यामुळे दिवस आनंदमय जातो.
तालुक्यात प्रथमच अॅड.हिरडे यांनी सुरू केलेल्या या हुरडा महोत्सवाचा आपल्या मित्र परिवाराला सोबत घेऊन आनंद घेऊ शकता. १९ जानेवारीपासून हा हुरडा महोत्सव सुरु झाला असून ५ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.
✍️ प्रवीण अवचर, मांगी (ता.करमाळा)






