कोतवाल भरती संदर्भात रहिवासाच्या अटीमध्ये जिल्ह्या जिल्ह्यात तफावत – उमेदवारांमध्ये भेदभावाची भावना

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – यावर्षी राज्यभरात सुमारे 5 हजार कोतवाल पदाच्या भरतीसाठी जाहिराती निघाल्या.काही ठिकाणी परीक्षा होऊन निवडी जाहीर झाल्या आहेत तर काही ठिकाणी अजून परीक्षा व्हायच्या आहेत. उमेदवाराला परीक्षा देण्यासाठी विविध अटी लागू होत्या. त्यापैकी उमेदवाराचा असणारा रहिवास या अटी मध्ये विविध जिल्ह्यात तफावत दिसून येत आहे. यामुळे उमेदवारांमध्ये भेदभावाची भावना निर्माण झाली आहे.
चौथी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सोलापूर, जळगाव, नागपूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नागपूर, अकोला, वाशीम, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यातील कोतवाल पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्या. यामध्ये उस्मानाबाद, बीड, परभणी,लातूर,नागपूर आदी जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या कोतवाल पदाच्या जाहिरातीत उमेदवार हा तालुक्यातील रहिवासी असावा अशी अट आहे तर सोलापूर, कोल्हापूर, अकोला, वाशीम,जळगाव यासारख्या जिल्ह्यातील कोतवाल भरतीच्या जाहिरातीत उमेदवार अर्ज करत असलेल्या तलाठी साझांतर्गत येणाऱ्या गावाचा रहिवासी असावा अशी अट आहे.

विविध जिल्ह्यात दिसून येणाऱ्या अटीच्या तफावतीमुळे उमेदवारांमध्ये भेदभावाची भावना निर्माण झाली आहे. प्रत्येक साझासाठी आरक्षण किंवा खुली जागा असते. ज्या तालुक्यातील जाहिरातीत तालुक्याचा रहिवासी असणे अशी अट आहे त्यांना कोणत्याही साझासाठी संधी उपलब्ध असते तर ज्या तालुक्यातील जाहिरातीत उमेदवार फक्त त्या साझातील गावात राहणारा असावा अशी अट आहे असे उमेदवार जर आरक्षण नसलेल्या जातीत असतील तर त्यांना संधी मिळत नाही. तालुक्यातील इतर ठिकाणी अर्ज करता येत नाही. त्यामुळे भेदभावाची भावना निर्माण होत असल्याची भावना कोतवाल पदासाठी इच्छुक असलेल्या तरुणांनी व्यक्त केली.

करमाळा तालुक्यात चिखलठाण, केत्तूर, विहाळ, कात्रज,पांडे, टाकळी, मलवडी, पारेवाडी, कंदर अशा ९ साजा साठी जाहिरात निघाली होती. यात काही तलाठी साझाना आरक्षण जाहीर झालेले. करमाळा तालुक्यातील
– हरी सिद्धार्थ माने रा. कात्रज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर
कोतवाल भरती जाहिरातीत कोतवाल पदासाठी उमेदवार हा तलाठी साझातील गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे परंतु इतर जिल्ह्यातील तालुक्याच्या कोतवाल पदांमधील अटींच्या किंवा शर्तींच्या नियमामध्ये तफावत आहे. इंटरनेटवर मी करमाळा तालुक्यातील कोतवाल भरतीची २०१७ ची जाहिरात पाहिली तर त्यात उमेदवार हा तालुक्यातील रहिवासी असावा अशी अट होती तर २०२३ च्या जाहिरातीत ही अट बदलली आहे. मी याविषयी तहसील कार्यालयात अर्ज दिला होता परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. शासनाने अटी मध्ये अशी तफावत करून आमच्या सारख्या उमेदवारांची उमेद कमी करू नये अशी शासनाला विनंती आहे.

