ग्रामसभांच्या माध्यमातून हुंडा प्रथेसह इतर अनिष्ट प्रथा बंद करण्याची मागणी

करमाळा(दि.२४): पुणे जिल्ह्यातील हुंडाबळी घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हुंडाबळी कायदा 1961 मध्ये अस्तित्वात आला असला तरी देखील आज ही समाजामध्ये हुंडा छुपे पद्धतीने घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष यांना निवेदन देत हुंडा प्रथेसह इतर अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबत मागणी केली आहे.

निवेदनात झिंजाडे यांनी नमूद केले आहे की, समाजातील केवळ हुंडाप्रथा नव्हे, तर विधवा प्रथा, बालमजुरी, बालविवाह, वाघ्या-मुरळी प्रथा, पोतराज, कौमार्य चाचणी, शिवीगाळ, देवदासी प्रथा, वेटबिगारी, जातिभेद तसेच मंदिरप्रवेश नाकारणे यांसारख्या अनिष्ट प्रथांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

तसेच, ग्रामसभांच्या माध्यमातून या प्रथांविरोधात ठराव संमत करून त्यांच्या विरोधात जनजागृती व प्रचार करण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी असल्याचेही झिंजाडे यांनी नमूद केले.




