उच्च ध्येय ठेवा; यश निश्चित मिळेल : डाॅ.हिरडे

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.१९: “विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय समोर ठेवून सातत्याने प्रयत्न केले, तर यश निश्चितच मिळते. त्यामुळे मोठी स्वप्ने पाहा आणि या क्षणापासून कामाला लागा,” असे प्रेरणादायी आवाहन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ॲड. बाबुराव हिरडे यांनी केले.

ते येथील नवभारत इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नुतन तालुका कृषी अधिकारी ऐश्वर्या फुलारी उपस्थित होत्या. व्यासपीठावर शाळेच्या संचालिका सौ. सुनिता कन्हैयालाल देवी, मुख्याध्यापिका अश्विनी क्षिरसागर, सहशिक्षिका मेघाली शेटे, सविता बागल तसेच सहशिक्षक नवनाथ इवरे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. हिरडे म्हणाले की, माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यावरच विद्यार्थ्यांनी आपणास नेमके काय व्हायचे आहे हे ठरवले पाहिजे आणि त्यासाठी ध्यास घेऊन अभ्यास केला पाहिजे. चिकाटी, धडपड आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावरच यश प्राप्त होते. समाजातील अनेक व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन यशस्वी झाल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत.
दहावीच्या परीक्षेचे कोणतेही दडपण न घेता आत्मविश्वासाने अभ्यास करा आणि उत्तरपत्रिका लिहा, असेही त्यांनी सांगितले. आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जे कष्ट करतात, त्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती साधावी, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्या ऐश्वर्या फुलारी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य पद्धत, वेळेचे नियोजन आणि यश संपादन करण्याचे सूत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालिका सुनिता देवी व मुख्याध्यापिका अश्विनी क्षिरसागर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थ्यांनीण केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका स्वाती काळे यांनी मांडले. यावेळी दहावीचे पियुष क्षिरसागर, तनिष्का बागल, श्रृती झाकणे, नभा वाशिंबेकर, स्वरा केशेगावकर,कु. जबोवानी याविद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
