माजी आमदार नारायण पाटील यांनी मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट -

माजी आमदार नारायण पाटील यांनी मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेलगाव (वां) (ता.करमाळा) येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करावे तसेच करमाळा मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन देवून केली.

मागील दोन दिवसांपूर्वी माजी आमदार नारायण पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष मुंबई येथे जाऊन भेट घेतली. याबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील शेलगाव (वां) येथे केळी संशोधन केंद्र निर्माण व्हावे अशी आपण 2018 पासुन मागणी करत आलो आहोत. करमाळा तालूका हा जसा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो अगदी तसेच मागील काही वर्षांपासून करमाळा तालुक्यातील केळी लागवड व उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे.

उजनी बॅकवाटरसह तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांना आता केळी या पिकापासून आर्थिक फायदा मिळू लागला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा केळीचे क्षेत्र जादा प्रमाणात आहे. सन 2021-22 या वर्षात 6671 हेक्टर क्षेत्र केळी लागवडी खाली आले होते तर यंदा सन 2022-23 या वर्षात यात वाढ होऊन 6978 हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. यापैकी 3584 हेक्टर ही सुरु म्हणजे चालू केळी असुन 3394 हेक्टरवर खोडवा पिक घेतले जात आहे.

केळीचे सरासरी उत्पादन हे प्रति हेक्टरी 69 टन इतके आले. यासाठी केळीच्या विविध जातीची 1 कोटी 32 लाख 75 हजार 136 इतक्या रोपांची लागवड करण्यात आली. तर केळी निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असून कंदर येथून 730 कंटेनर म्हणजे 14,600 मे. टन केळी निर्यात केली गेली. तसेच वाशिंबे 520 कंटेनर 10400 मे टन, वरकटणे 1240 कंटेनर 24800 मे टन, जेऊर 710 कंटेनर 14200 मे टन अशी एकूण 3200 कंटेनर मधून 64000 मे टन केळी निर्यात केली गेली. यामुळे करमाळा तालुक्यात केळीचे प्रचंड प्रमाणात उत्पन्न पाहता येथील शेतकऱ्याला या पिकाबाबत अधिक माहिती मिळावी, केळीच्या नवीन जातींवर संशोधन व्हावे, केळीवरील रोग व किडीवर अत्याधुनिक औषधासह उपचार पद्धती शोधून काढता यावी म्हणून एका सुसज्ज केळी संशोधन केंद्राची गरज असुन आपण ही मागणी लावून धरली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून लवकरच याबाबत कार्यवाही करु असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर करमाळा तालुक्यात सध्या केळी कोल्ड स्टोरेज व पॅक हाऊसची संख्या ही केवळ सहा इतकी असून, यात वाढ होण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांना विशेष अनूदान देण्यात येऊन निधीची तरतूद करण्यात आली यावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केल्याचे व करमाळा तालुक्यातील ऊस आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मा आ पाटील यांचा पाठपुरावा चालू असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!