वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान – शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळवून द्यावी : आशिष गायकवाड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील देवळाली परिसरात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे काही जणांच्या घरावरील पत्रे उडाले व शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, संबंधित घटनेचे पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच आशिष गायकवाड यांनी दिला.

या झालेल्या नुकसानीमध्ये केळी,ऊस आंबा,लिंबू यांसारख्या फळबागांचे नुकसान झाले असून देवळाली गावातील मारूती शंकर बिचितकर यांचेकडील एक मोठे झाड पडून त्यांची गाई दगावली आहे. सदर नुकसानीची दखल देवळाली मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी घेतली व त्यांनी तातडीने प्रशासनाला संपर्क साधुन नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे असे आवाहन केले. तसेच त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना संपर्क साधला त्यांनीही याबाबत प्रशासनाला आदेशित केले, त्यानंतर तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी मंडल अधिकारी, तलाठी भाऊसाहेब व कृषी सहायक यांना सदर नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले, तसेच संबंधित घटनेचे पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा.सरपंच आशिष गायकवाड यांनी दिला