वादळाचा तडाखा – पुनवर येथे धुमाळ बंधूंची २२ लाखांची केळी जमीनदोस्त

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२६: पुनवर येथे सोमवारी, दि. २५ मे २०२६ रोजी दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, यामध्ये श्रीकांत अरुण धुमाळ व अनिल अरुण धुमाळ या दोघा बंधूंच्या केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

धुमाळ बंधूंच्या गट क्रमांक ४५ मधील सुमारे दोन हेक्टर क्षेत्रावरील केळी बाग जोरदार वाऱ्यामुळे अक्षरशः जमीनदोस्त झाली. विक्रीसाठी तयार असलेली सुमारे दीडशे टन केळी वादळाच्या तडाख्यात कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या घटनेत सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, विक्रीच्या टप्प्यावर आलेले पीक अचानक आलेल्या वादळामुळे उद्ध्वस्त झाल्याने धुमाळ परिवार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. केळी पीक उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असताना, एका क्षणात संपूर्ण बाग कोसळल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती धुमाळ बंधुंनी तालुका कृषी अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे दिली आहे. शासनाने पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी धुमाळ परिवाराने केली आहे.

शेतकऱ्यांची मदतीची अपेक्षा
अचानक आलेल्या अवकाळी वादळामुळे पुनवर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केळीसारख्या खर्चिक पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

