
करमाळा(दि.१२) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी व शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून, रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत महावितरणकडून वीजपुरवठा बंद करण्यात येत होता. नेरलेचे माजी सरपंच औदुंबर राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली नेरले व परिसरातील विद्यार्थी – पालकांनी ६ जुलै रोजी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी रात्री सहा ते दहा च्या वेळेत बंद ठेवण्यात येणाऱ्या विजेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर यावेळेत शेतकऱ्यांसाठी जनावरांना चारा-पाणी देणे, दूध काढणे, महिलांना स्वयंपाक करणे आदी महत्त्वाची कामे करण्यात अडचण येतात. वीज नसल्याने सर्प व इतर वन्य प्राण्यांचा धोका वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.या सर्व समस्यांची आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना यांना माहिती दिली तसेच लेखी निवेदनही देण्यात आले होते.
त्याचबरोबर महावितरणचे कार्यकारी अभियंता, बार्शी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला होता. विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्याच दिवशी रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सायंकाळी सहा ते 10 दरम्यान वीजपुरवठा बंद करणे थांबवण्यात आले. या आंदोलनाला यश आले.
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतकरी, पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निर्णयाचे स्वागत करत शेतकऱ्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. ही वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची असून रात्री उशिरा वीजपुरवठा सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांना, महिलांना देखील अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. – औदुंबर राजेभोसले, माजी सरपंच नेरले तालुका करमाळा

