करमाळा येथे सहा महिन्यांपासून तहसीलदारपद रिक्त – लवकरात लवकर नेमणूक करण्याची नागरिकांची मागणी


करमाळा(संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथे गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्चस्ववादातून तहसीलदार यांची नेमणूक रखडलेली आहे. राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या मर्जीतील तहसीलदार याची नेमणूक व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु या राजकीय वर्चस्व वादात गेली सहा महिने करमाळा तालुक्यातील हजारो नागरिकांची तहसील कार्यालयातील रस्ता केस, कुळ कायदा व इतर अनेक कामे रखडलेली आहेत.

पूर्वीच्या तहसीलदारांनी तहसील आवारातील एजंटला हद्दपार केलेले होते ते पुन्हा नव्याने कार्यरत झालेले आहेत. तहसील कार्यालयातील सर्वसामान्यांची कामे एजंट शिवाय केली जात नाहीत. तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. ते कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तहसीलदार यांची नेमणूक होणे आवश्यक आहे,अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे.

गेल्या चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये वाळू वाहतूक व गौण खनिज उपसा भरमसाठ प्रमाणात चालू आहे. याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी. करमाळा शहराच्या चारही बाजूने बोगस प्लॉटिंग चालू आहेत व सदर प्लॉटिंगच्या कामासाठी हजारो ब्रास अवैध मुरूम उपसा केलेला आहे याची चौकशी करून संबधितावर कारवाई होणे गरजेचे आहे.

अ‍ॅड. प्रमोद जाधव,करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!